सीमावादात त्रयस्थाच्या हस्तक्षेपाची गरज नाही
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत-चीन यांच्यातील तणावाप्रकरणी अमेरिकेने पुन्हा एकदा चीनला सुनावले आहे. अमेरिकेचे विदेशमंत्री माईक पॉम्पियो यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, विदेशमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतल्यावर अमेरिका भारताकडून स्वतःच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी उचलण्यात आलेल्या पावलांसोबत असल्याचे म्हटले होते. अमेरिकेच्या विदेशमंत्र्यांच्या या विधानामुळे चीन बिथरला आहे. सीमा वाद हा दोन्ही देशांमधील द्विपक्षीय मुद्दा आहे. यात त्रयस्थाच्या हस्तक्षेपाला स्थान नसल्याचे चीनने म्हटले आहे.
भारत आणि चीन दोघेही राजनयिक स्तरावर आणि दोन्ही सैन्यांच्या अधिकाऱयांकडून यावर तोडगा काढला जात आहे. भारत आणि चीन हा वाद सोडविण्यास सक्षम असल्याचे चिनी दूतावासाने म्हटले आहे.
पॉम्पियो यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. होती. यावेळी त्यांनी जूनमध्ये गलवान खोऱयात हुतात्मा झालेल्या 20 भारतीय सैनिकांचे स्मरण करत श्रद्धांजली वाहिली होती. अमेरिका भारतासोबत ठामपणे उभा आहे. दोन्ही देश विविध क्षेत्रांमध्ये संयुक्त कार्य करण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचे पॉम्पियो यांनी म्हटले होते.