प्रतिनिधी/ कराड
दोन दिवसांपूर्वी झालेल्या घरफोडींच्या घटनांचा छडा लावण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कराडसह परिसरातील नागरिकांनी सतर्क रहावे. कॉलन्या, सोसायटय़ा, अपार्टमेंटमधील नागरिकांनी आपल्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी पुढकार घ्यावा. घरे बंद करून जाताना मौल्यवान वस्तू, रोकड घरात ठेवू नये, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजीत पाटील यांनी केले आहे.
आगाशिवनगर येथे शनिवारी तीन घरफोडय़ा झाल्या. बंद असलेली घरे फोडून चोरटय़ांनी रोकडसह दागिने पळवले. या घटनेचा तपास पोलिसांनी वेगाने सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना डॉ. रणजीत पाटील म्हणाले, पोलिसांनी कराड शहर, मलकापूर, सैदापूरसह परिसरात गस्त वाढवलेली आहे. रात्रीही पोलिसांची पथके वेगवेगळ्या भागात पाहणी करत आहेत. संशयास्पद हालचाली असलेल्यांवर पोलीस नजर ठेवून आहेत. त्यांचे ठावठिकाणे सातत्याने तपासले जात आहेत. यासंदर्भात कराड शहर, तालुका पोलीस, गुन्हे प्रकटीकरण शाखा, वाहतूक पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत. पोलिसांचे मनोबल वाढेल यासाठीही प्रयत्नशील आहोत.
नागरिकांनी मुक्कामी बाहेरगावी जाताना रोकड, मौल्यवान वस्तू घरी ठेवू नयेत. घर जास्त काळ बंद राहणार असेल तर योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे. शहरासह परिसरातील नागरिकांनी एकत्र येत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. आपापल्या कॉलन्या, सोसायटय़ांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यास त्याचा फायदा होईल. सीसीटीव्हीमुळे प्रत्येक संशयास्पद हालचाल टिपली जाईल. त्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.