- ‘आंतरभारती’ दिवाळी अंकाचे शरद पवारांच्या हस्ते प्रकाशन
ऑनलाईन टीम / पुणे :
धर्मनिरपेक्षता ही संकल्पना भारतासारखा देश एकसंध ठेऊ शकते. त्याच संकल्पनेला छेद देण्याचा आज प्रयत्न होत आहे. तो यशस्वी होऊ देता कामा नये. धर्मनिरपेक्षतेला विरोध असणारेच आज सत्तेवर आहेत. हिंदू – मुस्लीम, इतर समाजात अंतर निर्माण केले जात आहे. कटुतेला शासकीय आधार दिला जात आहे. राज्य सत्तेचा वापर केला जात आहे. म्हणून आपण धर्मनिरपेक्ष विचारांचा प्रसार केला पाहिजे. या कामी जाणकारांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केले.
‘आंतरभारती’ दिवाळी अंकाचे प्रकाशन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते त्यांच्या मोदी बाग या निवासस्थानी मंगळवारी सकाळी अनौपचारिकरित्या करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
पवार म्हणाले, भाषा, जात, धर्म या समाज दुभंगता कामा नये.आंतरभारती या दिशेने काम करेल, अशी आशा आहे. या कार्याला मी शुभेच्छा देतो.साने गुरुंजीनी एकसंध समाजासाठी योगदान दिले. त्यांचे आंतरभारती चे स्वप्न आपण सर्वांनी साकार केले पाहिजे. आंतरभारतीचे विचार अन्य भाषांमध्ये गेले पाहिजेत. वैचारिक दिशा देणारा हा अंक आहे.
आंतरभारती दिवाळी अंकाचे अतिथी संपादक आणि माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, वाचकांचे धर्मनिरपेक्षतेवर उद्बोधन करण्याचा प्रयत्न या अंकात केला आहे. धर्म चिकित्सा, चिंतन, राजकिय भूमिकां, संविधान असा वैचारिक परिप्रेक्ष्य या अंकात घेतला आहे. सहिष्णुतेची संस्कृती जपली पाहिजे. चिकित्साही व्हावी, असा अंकात प्रयत्न केला आहे.