ऑनलाईन टीम / मुंबई :
महावितरण’ने भविष्यातील संधी ओळखून दररोज जास्तीत जास्त वीज निर्मिती करावी. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान,नवनवीन संकल्पनाचा अवलंब करून कार्यक्षमता वाढवावी, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी दिले.
‘व्हिजन- 2030 साठीचा नियोजन आराखडा’ या विषयावरील खास व अभिनव संकल्पने अंतर्गत मुंबई मुख्यालय येथे संपन्न झालेल्या महानिर्मितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
ते म्हणाले, आगामी 10 वर्षांचा नियोजनबद्ध आराखडा बनवून व त्याची यशस्वी अंमलबजावणी करून महानिर्मिती खुल्या स्पर्धेत उतरून देशाच्या वीजक्षेत्रात नक्कीच उज्ज्वल वाटचाल करू शकते असा विश्वास मा ऊर्जामंत्री यांनी या प्रसंगी व्यक्त केला.आगामी काळात मेरिट ऑर्डर डिस्पॅच प्रणाली ही केवळ राज्यपातळीवरच नव्हे तर देश पातळीवर राबवली जाईल,याची वेळीच दखल घेऊन अत्यंत कार्यक्षमता राखून वीजनिर्मिती साध्य करावी लागणार आहे, असेही ते म्हणाले.
- सौरऊर्जेसाठी उपकंपनी स्थापणार
सदर बैठकीत महानिर्मितीची शक्तिस्थाने-विविध समस्या- स्पर्धात्मक वीजक्षेत्रातील भावी संधी यावर विस्तृत चर्चा करण्यात आली. सर्वाधिक औष्णिक स्थापित क्षमता हे जरी सध्या महानिर्मितीचे बलस्थान असले तरीही यापुढील काळ हा अपारंपारिक ऊर्जेचा आहे याचे भान ठेवून अंमलबजावणीत रखडलेले काही सौर प्रकल्प वेगाने मार्गी लावणे गरजेचे आहे ,तसेच या क्षेत्रातील अद्ययावत संकरित तंत्रज्ञान अवगत करून टप्प्याटप्प्याने भावी काळातील सुमारे 2700 मेगावाट क्षमतेचे सौरप्रकल्प गतिमानतेने साकारावेत असे निर्देश त्यांनी या प्रसंगी दिले.
हे नियोजन प्रभावीपणे करण्यासाठी महानिर्मिती कंपनी अंतर्गत सौर ऊर्जेसाठी एक उपकंपनी स्थापन केल्यास उत्तरदायित्व निश्चित करून विहित वेळेत सौरऊर्जा क्षमता वाढ शक्य होईल असेही त्यांनी सूचित केले. महानिर्मितीकडे सध्या उपलब्ध मोकळ्या जमिनींचा पर्यावरण पूरक छोटे छोटे सौर प्रकल्प उभारणीसाठी कसा उपयोग होऊ शकेल याचीही व्यवहार्यता तपासण्याचे निर्देश त्यांनी दिले.