एखादा फलंदाज धावचीत होतो, त्यावेळी त्याच्या चेहऱयावर त्या-त्या परिस्थितीप्रमाणे हजारो छटा नेहमी पाहण्यात येतात. राग असतो, निराशा असते आणि अगदी काही वेळा ज्या सहकाऱयामुळे धावचीत होण्याची वेळ येते, त्याच्यावर संतापणे देखील असते. मुंबई इंडियन्सच्या डावात मात्र मंगळवारी वेगळेच चित्र पाहण्यात आले. येथे सुर्यकुमार यादव धावचीत झाला. पण, सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी आपली चूक लक्षात घेत स्वतःहून क्रीझ सोडण्याचा निर्णय घेतला आणि यानंतर नेटिझन्समध्ये त्याच्यावर कौतुकाची बरसात होत राहिली.
आयपीएल स्पर्धेच्या फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रोहित स्वप्नवत खेळत होता. त्यानंतर रोहितने एकेरी धावेसाठी दिलेला कॉल सुर्यकुमारच्या लक्षात आला नाही आणि तो चेंडूकडे पाहत राहिला. एव्हाना रोहित नॉन स्ट्रायकर एण्डवर पोहोचला होता तर नॉन स्ट्रायकर एण्डवरीलच सुर्यकुमारने अगदी आपली जागाही सोडली नव्हती. पण, ही चूक लक्षात येताच त्याने रोहितसाठी स्वतःची विकेट बहाल करणे पसंत केले आणि क्रीझ सोडून तो थेट तंबूच्या दिशेने परतला.
सुर्यकुमार यादवने अद्याप राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधीत्व केलेले नाही. पण, योगायोगाने सुपरस्टार विराट कोहलीप्रमाणेच हा युवा फलंदाज देखील तिसऱया स्थानीच खेळतो. सुर्याने या लढतीत देखील एक चौकार, दुहेरी धावासह दमदार सुरुवात केली होती. पण, त्यानंतर धावचीतचे हे नाटय़ घडले. रोहितने मिडऑफकडे चेंडू फटकावल्यानंतर एकेरी धावेसाठी कॉल दिला. पण, सुर्यकुमारच्या ते लक्षातच आले नव्हते.
रोहितला स्वतःला देखील चूक लक्षात आली. पण, तोवर खूपच उशीर झाला होता. तिकडे, सुर्यकुमारने मात्र चेहऱयावर कोणतेही भाव न दर्शवता तंबूचा रस्ता धरला. सामना झाल्यानंतर सुर्यकुमारने जी प्रतिक्रिया दिली, ती तर त्याहून अधिक महत्त्वाची होती. सुर्यकुमार येथे म्हणाला, ‘ज्या फॉर्ममध्ये रोहित खेळत होता, ते पाहता मी स्वतःची विकेट बहाल करणेच योग्य होते’!