अनोख्या पद्धतीच्या निषेधाची शहरात एकच चर्चा
राजेंद्र होळकर / इचलकरंजी
गेली वर्षभर नागरिकांचे हाडे खिळखिळी करणारा, वाहनांचे पार्ट सैल करणारा व अपघातांना आमंत्रण देणाऱ्या महासत्ता चौक ते आमराई मळ्याकडे जाणाऱ्या खराब रस्त्याचे काम एक वर्ष उलटून गेले, तरीही सदर रस्त्याचे काम अर्धवट आहे. याच्या निषेधार्थ परिसरातील नागरिकांनी चक्क रस्त्यावर केक कापून अनोख्या पद्धतीने अर्धवट रस्त्याचा वाढदिवस साजरा केला. तसेच आंदोलकांनी या अपूर्ण रस्त्याचे काम झालेच पाहिजे अशा घोषणा देत येणाऱ्या जाणाऱ्यांना निषेधात्मक साखर देखील वाटली. अशा या अनोख्या पद्धतीच्या निषेध आंदोलनाची शहरात एकच चर्चा केली जात आहे.
एकीकडे सर्व ठिकाणी दिवाळी सणाचे आनंदपूर्ण वातावरण असताना दुसरीकडे मात्र वर्षभर खराब रस्त्यांमुळे संतप्त झालेल्या आमराई मळा भागातील नागरिकांनी अनोखे आंदोलन केले. नियोजनशून्य कारभार करणाऱ्या नगरपालिका प्रशासनाचा धिक्कार करण्यात आला. तक्रारी, वारंवार सूचना करूनही लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासनाने या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केले आहे.
आमराई मळा परिसरात मोठ्या संख्येने नोकरदार, शिक्षक आणि शेतकरी राहत आहे. मळ्यालगत शेतीही मोठी आहे. त्यामुळे या रस्त्यावर नागरिकांची सतत ये-जा असते. यातच या मळ्याचा मुख्य रस्ताच खराब झाला आहे. या खराब रस्त्याची दखल घेवून त्याचे खडीकरण आणि डांबरीकरण करण्याचा पालिकेने निर्णय घेतला. गेल्या वर्षी दिवाळीत या खराब रस्त्याच्या खडीकरण आणि डांबरीकरणाचा नारळ फुटला. तब्बल एक वर्षाचा कालावधी लोटला. तरीसुद्धा या रस्त्याचे काम अर्धवट राहिल्याने पालिकेच्या नियोजनशून्य कारभार समोर आला आहे.
या रस्त्याच्या कामाला सुरुवात होऊन एक वर्षाचा कालावधी लोटला. तरीसुद्धा रस्त्याचे काम पूर्ण नझाल्याच्या निषेधार्थ आमराई मळा परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर उतरून गांधीगिरी पद्धतीने केक कापून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
या आंदोलनावेळी मधुकर मुसळे, सचिन वरपे, उत्तम साळुंखे, राजेंद्र गुरव, सुरज येलाज, विजय पाटील, रोहित जाधव, ओम गुरव, मोहित कोळेकर, प्रल्हाद टिकारे, पिंटू जाधव, किरण लंगोटे, अण्णा मिठारे, दिलीप शिंदे, डी.डी. कुलकर्णी यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते.