प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी कार्यालय सातारा यांच्या अधिनस्त जिल्ह्यात ११ बालगृहे, आशा किरण महिला वसतिगृह कराड तसेच पुरुष भिक्षेकरीगृह सातारा यामध्ये कोरोनाला नो एण्ट्री होती. सर्वच बालके, प्रवेशित असलेले सुरक्षित आहेत, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे यांनी दिली.
महिला व बालविकास अधिकारी कार्यालय सातारा यांच्या अधिनस्त जिल्ह्यात ११ बालगृहे, आशा किरण महिला वसतिगृह कराड तसेच पुरुष भिक्षेकरीगृह सातारा येथे चालवण्यात येते. दि.23मार्च 2020रोजी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन सूरु असताना बालगृहात दाखल असलेल्या मुलांची काळजी महिला व बालविकास अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत योग्य पध्दतीने घेण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील ११ बालग्रहात २९९ एवढे प्रवेशित सुरक्षितपणे कोणताही आजार न होऊ देता योग्य पद्धतीने त्यांचे पालन पोषण करण्यात आले. लॉकडाऊन काळात ३० जणांना नव्याने प्रवेश देण्यात आला. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कौटुंबिक हिंसाचारग्रस्त रस्त्यावर भटकणाऱ्या ५८ महिलांनी लॉकडाऊन सुरू झाल्यापासून संस्थेत प्रवेश घेतला. त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात आले, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे यांनी दिली.
23 मार्चला देशात लॉकडाऊन करण्यात आले. शाळा, महाविद्यालये आणि आश्रमशाळा, वसतिगृह बंद करण्यात आली. परंतु महिला व बाल कल्याणची सर्व बालगृहे, महिला राजगृहे, भिक्षेकरी ग्रह, नोकरी करणाऱ्या महिलांचे वसतिगृह चालू होती. लॉकडाऊनचा फटका बसलेली आणि लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेली अनेक बालके, महिला या संस्थांमध्ये दाखल करण्यात आली. नव्याने येणाऱ्यासाठी वेगळा विलीनीकरण कक्ष स्थापन करण्यात आला. त्यात नव्याने आलेल्यांना ठेवण्यात आले. विलीनीकरण कक्षात वाचन साहित्य, करमणुकीचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. बाहेरून येणाऱ्यांना प्रवेश बंद होता. तसे बोर्ड लावले होते.
संस्थेत दर पंधरा दिवसांनी औषध फवारणी करण्यात येत होती. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत प्रत्येक बाल ग्रहाला ऑक्सिमिटर, थर्मल स्कँनर मशीन, सॅनिटायझर, साबण पुरवण्यात आले. बालकल्याण समितीचे सदस्य ऍड. सातपुते, ऍड.गोवेकर यांच्या सहकार्याने दानशूर व्यक्तींनी मास्क मिळवून वाटप करण्यात आले. प्रवेशितांची उपासमार होऊ नये म्हणून पुरेसा धान्यसाठा असावा म्हणून ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज ट्रस्टकडे विनंती करून त्यांच्याकडून १७ पोती गहू, 20 पोती तांदूळ,100 किलो साखर, 100 किलो तूरडाळ, 100 किलो गोडेतेल मिळवले.सर्व बालगृहाना वाटप करण्यात आले.
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ऑन लाईन शिक्षणाची घोषणा करताच बाल गृहातील बालक वंचित राहू नयेत यासाठी खासदार उदयनराजे यांची भेट घेऊन त्यांच्याकडून दूरचित्रवाणी संच सेट टॉप बॉक्स पुरवण्यात आला, असे ही त्यांनी सांगितले.