गटविकास अधिकाऱयांचे आवाहन : सावंतवाडी पं. स. सभेत ‘उमेद’घोटाळय़ाचे पडसाद : कारिवडे ग्रामसमितीवर ठपका
वार्ताहर / सावंतवाडी:
महिला बचतगटांच्या पैसे उकळण्यासाठी सिंधुदुर्गात टोळी कार्यरत आहे. एक महिला या टोळीची म्होरकी आहे. तिने आतापर्यंत सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ भागातील ग्रामसमित्यांची फसवणूक केली आहे. तसेच उमेद योजनेंतर्गत शासनाच्या निधीतील 22 लाख रुपयांचा घोटाळा याच टोळीने केला आहे. त्यात घावनळे व कारिवडे ग्रामसमितीवर फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे बचतगटांनी जागृत राहवे, असे आवाहन सावंतवाडी पंचायत समिती बैठकीत गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी केले. उमेद अंतर्गत शासनाच्या 22 लाख रुपयांचा घोटाळा ग्रामसमिती गटात झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद सतर्क झाली आहे. सावंतवाडी तालुक्यात कारिवडे पाठोपाठ कोलगावमध्ये फसवणूक प्रकरण घडले आहे, असे नाईक यांनी स्पष्ट केले.ं
सावंतवाडी पंचायत समितीची मासिक बैठक ऑनलाईन झाली. या सभेत माजी सभापती रवींद्र मडगावकर यांनी उमेद संस्थेंतर्गत 22 लाखाच्या घोटाळय़ाचे काय? असा सवाल केला. गावातील बचतगटांची फसवणूक प्रकरणे घडत आहा, असा प्रश्न उपस्थित केला. यानंतर सभागृहात धक्कादायक बाब नाईक यांनी उघड केली.
नाईक म्हणाले, उमेदअंतर्गत शासनाचे 22 लाख रुपये कुडाळ तालुक्यातील घावनळे ग्रामसमिती गटांतर्गत खर्च करणे अपेक्षित होते. हे पैसे परस्पर कारिवडे ग्रामसमिती गटाच्या नावे काढून खर्च करण्यात आले. ही वस्तुस्थिती आहे. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या घोटाळय़ाप्रकरणी पाचजणांची चौकशी समिती गठीत केली होती. या चौकशीत हा घोटाळा झाल्याचे उघड झाले. यानुसार घावनळे व कारिवडे ग्रामसमिती गटाच्या अध्यक्ष, सचिव, खजिनदार यांच्याविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कारिवडे समितीकडून 11 लाख वसूल
नाईक म्हणाले, कारिवडे ग्रामसमितीकडे 22 लाख दिले होते. त्यापैकी 11 लाख वसूल करून घेतले आहेत. घावनळे ग्रामसमिती गटाच्या अखत्यारित 22 लाख खर्च करण्याचे असताना तालुक्याबाहेर 22 लाख परस्पर वाटप केले. तसेच काही शासनाची नोंदणीकृत नसलेल्या संस्थेकडे वर्ग केल्याची बाब चौकशीत अघड झाली आहे. या घोटाळा प्रकरणाचा ठपका चौकशी समितीने कारिवडे ग्रामसमिती गटावर ठेवला आहे. याच प्रकरणातून एक महिला कोलगावमध्ये बचतगटाचे पैसे उकळत आहे. त्यांची फसवणूक करीत आहे. तालुक्यात अन्य कुणा बचतगटाची अशी फसवणूक झाली असेल, तर पंचायत समितीला कळवावे, असे आवाहन सभापती मानसी धुरी यांनी केले.
भात नुकसानीचे काय झाले?
अतिवृष्टीमुळे भातशेतीचे नुकसान झाले त्याचे पंचनामे करण्यात आले. भरपाई शासनाने घोषित केली. भरपाई रकमेच काय झाले?, असा सवाल उपसभापती शीतल राऊळ, रवींद्र मडगावकर, बाबू सावंत यांनी केला. यावर तालुका कृषी अधिकारी यांनी तहसील कार्यालयाकडे रक्कम जमा झाल्याचे स्पष्ट केले. शासन फसवणूक करीत आहे, असा सदस्यांनी आरोप केला. कृषी अवजारे, ग्रासकटर आदी अवजारांबाबत कृषी विभाग शेतकऱयांची फसवणूक करीत आहे, असे बाबू सावंत यांनी स्पष्ट केले.
संदीप नेमळेकर, बाबू सावंत यांनी सर्व रस्त्यावर झाडी वाढली आहे, त्यामुळे अपघात होणार आहेत. बांधकाम विभागाने रस्त्याची देखभाल करावी. यावेळी सभापती धुरी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची अधिकारी अनिल आवटे यांना चांगलेच खडसावले. ‘इन्सुली घाटरस्त्याबाबत आम्ही जेव्हा आंदोलन केले, त्यानंतर तुम्ही जागे होऊन आठ दिवसात काम करता. आम्हाला आंदोलन का करायला लावता, वेळेत अशी कामे करा’, असे सांगितले. बाबू सावंत यांनी सावंतवाडी पोलीस लाईनजवळील रस्त्याची दुरुस्ती करताना सुपरवायझर कोठे असतात?, असा प्रश्न केला.
पंचायत समिती इमारत
पंचायत समितीची नवीन इमारतीचा साडेआठ लाखाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तो मंजुरीला पाठविण्यात येणार आहे. तसेच कृषी गोडाऊन बांधकाम इमारत निर्लेखित केली जाणार आहे, असे सभापती धुरी यांनी स्पष्ट केले. यावेळी पं. स. सदस्य गौरी पावसकर, सुनंदा राऊळ, निकिता सावंत, रुपेश राऊळ, रेश्मा नाईक, संदीप गावडे आदी उपस्थित होते.