प्रतिनिधी/ पणजी
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना काल मंगळवारी पत्र लिहून गोवा मुक्तीच्या 60 व्या वर्धापनदिनानिमित्त सामान्य लोकांसाठी शंभर कोटीचे पॅकेज जाहीर करावे अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्यसैनिक, स्थानिक कलाकार व संस्थांच्या सहभागानेच कार्यक्रम आयोजित करावेत. कोरोना व आर्थिक संकटात जनता हवालदील असताना वायफळ खर्च न करता राज्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी योजना आखण्यावर भर द्यावा, अशीही मागणी केली आहे.
गोवा मुक्तीला 60 वर्षे झाल्यामुळे पुढील वर्षभर आयोजित करण्यात येणाऱया कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी सरकारने गठन केलेल्या समितीवर आपले नाव टाकण्यापूर्वी आपल्याकडे कुणीच संपर्क साधला नाही. मंगळवार दि. 1 डिसेंबर रोजी यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीचे सूचनापत्र आपणास केवळ एक दिवस अगोदर देण्यात आले. सरकारने कोविड संकट काळात गोवा मुक्तीच्या 60 व्या वर्षपूर्ती निमित्त अवाढव्य खर्च करण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरूद्ध अनेक स्वातंत्रसैनिक, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार, शिक्षक तसेच अनेकजणांनी आपल्याशी संपर्क साधून सदर खर्च करणे योग्य नसल्याचे मत प्रकट केले आहे, असे दिगंबर कामत यांनी पत्रात नमूद केले आहे. आजच्या संकट काळात अनाठायी खर्च न करता, गरीब व सामान्य लोकांसाठी मदतीचा हात देणे हिच गोवा मुक्तीसाठी आपले प्राण व योगदान दिलेल्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांसाठी खरी मानवंदना ठरेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
योजनांचे पैसे देण्यात सरकार अपयशी
सरकारी कर्मचाऱयांची गृह कर्ज योजना चालू ठेवण्यास निधी उपलब्ध नाही. दयानंद सामाजिक सुरक्षा योजना, विधवा, दिव्यांग तसेच ज्ये÷ नागरिक, गृह आधार, खलाशी यांचे मासिक पेंशन सहा-सहा महिने सरकार देत नाही. गोव्यातील सिने निर्मात्यांना अर्थसहाय्य देण्याची योजना सरकारने आठ वर्षे बंद ठेवली आहे. सरकारच्या मदतीची मागील सहा सात महिने लाडली लक्ष्मीचे अर्जदार वाट पाहत आहेत, असा दावा कामत यांनी केला आहे.
‘गोवा व्हिजन 2035’ ची अंमलबजावणी करावी
गोव्यातील सामान्य व पारंपरिक व्यावसायिकांना मदत देण्यासाठी 100 कोटींची आर्थिक पॅकेज सरकारने जाहीर करावे अशी मागणी आपण 14 मे 2020 रोजी सरकारकडे केली होती. परंतु, सरकारने अजूनही त्याची दखल घेतलेली नाही. गोवा मुक्तीचा सुवर्ण महोत्सव साजरा करताना आपल्या सरकारने गोवा व्हिजन -2035 अहवाल तयार करण्यासाठी नामवंत शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली विवीध क्षेत्रातील तज्ञांची समिती स्थापन केली होती. सदर समितीने तयार केलेला अहवाल 2012 नंतर सरकारने कपाटात बंद करुन ठेवल्याचे सांगुन, मुख्यमंत्र्यानी सदर अहवालाची ताबडतोब अंमलबजावणी करावी अशा मागणी केली आहे.
‘गोंयचे दायज’ योजना त्वरित सुरु करावी
कांकणकार, खाजेकार, फुलकार, रेंदेर, पोदेर, मोटरसायकल पायलट अश्या गोव्यातील पारंपरिक व्यावसायिंकासाठी काँग्रेस सरकारने तयार केलेली ‘गोंयचे दायज’ योजना ही सरकारने सुरू केल्यास गोवा राज्याला प्रगतिशील बनविण्याकडे एक महत्वाचे पाऊल पडेल, असे दिगंबर कामत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
काँग्रेस सरकारने गोवा मुक्तीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात प्रत्येक पंचायत व नगरपालिकांना खास प्रकल्पांसाठी निधी दिला होता, याची आठवण दिगंबर कामत यांनी मुख्यमंत्र्यांना करुन दिली आहे. सरकारकडे प्रलंबित असलेल्या अर्जातील सर्व स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना त्वरित सरकारी नोकरीत सामावून घेणे खऱया अर्थाने स्वातंत्र्यसैनिकांसाठी मानवंदना ठरेल. स्वातंत्र्यसैनिक संघटना, स्थानिक कलाकार संस्था, कला व संस्कृती संचालनालय, गोवा कोंकणी व गोवा मराठी अकादमी, मिनेझिस ब्रागांझा संस्था, गोवा विद्यापीठ तसेच इतर संस्थांचा समावेश करुन व सहकार्याने राज्य पातळीवर कार्यक्रम आयोजित करावेत व त्यात केवळ स्थानिक कलाकारांना संधी द्यावी, असेही त्यांनी सूचविले आहे.