खानापूर / प्रतिनिधी
गोहत्या बंदी विधेयकाला मंजुरी दिल्याबद्दल खानापूर तालुका भाजपच्यावतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त डुक्करवाडी गावात आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात गो-मातेची पूजा करण्यात आली. गेली अनेक वर्षे हिंदू धर्मियांकडून गोहत्या बंदी आणावी, अशी मागणी करण्यात येत होती. ती मागणी बी. एस. येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजप शासनाने पूर्ण केल्याबद्दल राज्य सरकारला यावेळी धन्यवाद देण्यात आले.
यावेळी बोलताना जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी म्हणाले, कर्नाटक राज्यात गोहत्या बंदी आणावी, अशी अनेक वेळा मागणी करण्यात आली होती. या आधी अनेक हिंदुत्ववादी युवकांनी कसाईखान्याला नेत असलेल्या गायींना अडवून त्यांना जीवदान देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बऱयाच हिंदू कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हेही दाखल केले होते. पण त्यांची तमा न बाळगता गोहत्या बंदीसाठी अनेक वेळा आंदोलने करण्यात आली. अखेर राज्य शासनाने गोहत्या बंदी कायदा अंमलात आणून समस्त हिंदू बांधवांना न्याय दिला आहे.
यावेळी तालुका भाजपाध्यक्ष प्रमोद केचेरी, राज्य कार्यकारिणी सदस्या धनश्री सरदेसाई, तालुका सरचिटणीस गुंडू तोपिनकट्टी, नगरसेवक आप्पय्या कोडोळी, युवा नेते पंडित ओगले, किरण यळ्ळूरकर, जॉर्डन गोन्साल्विस, राजू रायका, राजू जांबोटकर, महांतेश बाळेकुंद्री, किरण तुडवेकर, लोकेश कलबुर्गी, जोतिबा गुरव यासह भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.