राज्य सरकार निर्णयावर ठाम : शिक्षण खात्याकडून अभ्यासक्रमातही कपात
प्रतिनिधी/ बेंगळूर
शाळा-महाविद्यालये 1 जानेवारीपासून सुरू करण्याच्या निर्णयात कोणताही फेरबदल करण्यात येणार नाही. यापूर्वी घेतलेल्या निर्णयानुसारच 1 जानेवारीपासून दहावी आणि बारावीचे वर्ग नियमितपणे आणि सहावी ते नववीपर्यंत विद्यागम कार्यक्रमांतर्गत शिक्षण देण्यास प्रारंभ होणार आहे. याकरिता शिक्षण खात्याने जय्यत तयारी केली असून खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना शाळांना आणि शिक्षण खात्यातील अधिकाऱयांना दिल्या आहेत.
सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी याविषयी माहिती दिली. शाळा-महाविद्यालये सुरू करण्याबाबत कोणतीही समस्या नाही. खबरदारीच्या उपाययोजना करून शाळा सुरू करण्याचा सल्ला कोविड तांत्रिक सल्लागार समितीने दिला आहे, असे ते म्हणाले. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आरोग्य आणि शिक्षण खात्याला कठोर सूचना दिल्या असून शाळा-महाविद्यालयांमध्ये कोविड मार्गसूचीचे काटेकोर पालन झालेच पाहिजे, अशी सूचनाही दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील 8 महिन्यांपासून शाळा-महाविद्यालये बंद आहेत. पदवी, पदव्युत्तर आणि वैद्यकीय महाविद्यालये अलिकडेच सुरू झाली आहेत. मात्र, प्राथमिक-माध्यमिक शाळा आणि पदवीपूर्व महाविद्यालये अद्याप सुरू झालेली नाहीत. दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा विचारात घेऊन शिक्षण खात्याने 1 जानेवारीपासून या दोन्ही इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी नियमितपणे शाळा-महाविद्यालये 1 जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी शिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकाऱयांच्या बैठकीत पहिली ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय अध्यापन कालावधी 200 ते 180 तासांवरून 120 तासांपर्यंत कमी करण्यात आला आहे. 1 सप्टेंबर ते 31 मार्चपर्यंत लागू होईल, अशा पद्धतीने शैक्षणिक कार्यक्रम निश्चित करण्यात आल्याचे समजते.
पाठय़पुस्तक संघामार्फत पहिली ते दहावीच्या अभ्यासक्रमात कपात करण्यात आली आहे. प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमातील धडे वगळण्यात आले आहेत. महत्त्वाचे घटकच प्राधान्यक्रमाने शिकविण्यासाठी निश्चित करण्यात आले आहे. अभ्यासक्रमात साधारणतः 40 टक्के कपात करण्यात आल्याचे समजते. लवकरच यासंबंधी अधिक माहिती शिक्षण खात्याकडून प्रसिद्ध केली जाईल.
शिक्षकांना स्वॅब तपासणी सक्तीची
शाळा-महाविद्यालये सुरू होत असल्याने सर्व शालेय शिक्षक आणि कर्मचाऱयांना कोविड चाचणीची सक्ती करण्यात आली आहे. शिक्षकांच्या अनुकुलतेसाठी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे, तालुका-जिल्हा इस्पितळांवर ताण पडू नये यासाठी अनेक ठिकाणी शाळांमध्येच शिक्षकांचे स्वॅब जमा केले जात आहेत. 1 जानेवारीपूर्वी शिक्षकांच्या कोविड चाचणीचे अहवाल उपलब्ध होणार आहेत.
मार्गदर्शन करण्याची आमदार, मंत्र्यांना विनंती
1 जानेवारीपासून शाळा-पदवीपूर्व महाविद्यालये सुरू होणार असून विद्यागमलाही प्रारंभ होणार आहे. त्यामुळे शिक्षण खात्याला मार्गदर्शन करावे, अशी विनंती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी मंत्री, आमदारांना पत्राद्वारे केली आहे. आमदार, जिल्हा पालकमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रामध्ये सुरेशकुमार यांनी 1 जानेवारीपासून शाळा-महाविद्यालये सुरू करण्याबाबत समन्वय आवश्यक आहे. त्यामुळे अधिकाऱयांना योग्य सल्ले द्यावेत. शिक्षण खात्याला मार्गदर्शन, सहकार्य करा, अशी विनंती केली आहे.
निर्णयात सरकारकडून बदल नाही!
शाळा सुरू करण्याच्या बाबतीत सरकारकडून कोणताही बदल करण्यात आलेला नाही. खबरदारी उपाययोजनांसह शाळा सुरू केल्या जाणार आहेत. कोविड मार्गसूचीचे पालन करण्याची सूचना सर्व शाळा-महाविद्यालयांना देण्यात आली आहे.
-येडियुराप्पा, मुख्यमंत्री