वृत्तसंस्था/ मेलबर्न
कोरोना महामारीच्या ब्रेकनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा सुरुवात करण्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाला आता आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. जानेवारीत भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱयावर जाणार होता. पण हा नियोजित दौरा वर्षभरासाठी स्थगित केला असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गुरुवारी जाहीर केले.
गेल्या मार्चमध्ये भारतीय महिला संघाने टी-20 विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना खेळला होता, तोच त्यांचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. जानेवारीत भारतीय संघ तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱयावर जाणार होता. 22 जानेवारी रोजी कॅनबेरा, 25 जानेवारी रोजी मेलबर्न व 28 जानेवारी रोजी होबार्ट येथे हे सामने खेळविले जाणार होते. पण आता हे सामने 2022 मध्ये होणाऱया महिलांच्या वनडे विश्वचषक स्पर्धेच्या आधी खेळविण्यात येणार असून त्यात टी-20 चे तीन सामनेही सामील करणार असल्याचे सीएने स्पष्ट केले आहे. 2022 च्या मार्च-एप्रिलमध्ये विश्वचषक स्पर्धा हार आहे.
‘ऑस्ट्रेलिया व भारताच्या महिला संघांना पुढील वर्षी वाढीव मोसमाला सामोरे जावे लागणार असून दोन्ही देशांतील चाहत्यांसाठी ही पर्वणी ठरेल,’ असे सीएचे हंगामी सीईओ निक हॉकली म्हणाले. ‘या उन्हाळय़ात भारतीय महिलांची मालिका आयोजित करण्याचे आम्ही निश्चित केले होते. पण जागतिक महामारीच्या प्रभावामुळे ही मालिका लांबणीवर टाकणे आम्हाला भाग पडले आहे,’ असेही ते म्हणाले. मेलबर्नवर झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने 85 धावांनी विजय मिळविला होता. ‘गेल्या मार्चमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकातील या अंतिम सामन्याला चाहत्यांनी प्रचंड प्रतिसाद देत विक्रमी उपस्थिती दर्शविली होती. त्यामुळे भारतीय संघाची मालिका आयोजित करणे आनंददायक आणि लाभदायक ठरेल,’ असेही ते म्हणाले. स्थगित केलेल्या मालिकेचे नवे वेळापत्रक व केंद्रे निश्चित झाल्यानंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे सीएने स्पष्ट केले.