आघाडी सरकारने गेले वर्षभर औरंगाबाद शहर किंवा जिह्याशी संबंधित अनेक निर्णय घेतले. मात्र सरकार दप्तरी औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा कधीच नव्हता.
शिवसेना, काँगेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या मधुचंद्राचे दिवस संपले आहेत. गेले वर्षभर संसार सुरळीत सुरू असताना आघाडीत आता भांडय़ाला भांडे लागू लागले आहे. भांडय़ाच्या या आवाजाने विरोधी पक्ष भाजपला आनंद झाला आहे. औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून आघाडीत मिठाचा खडा पडला असला तरी भाजपने हुरळून जाण्याचे कारण नाही. कारण नामांतराच्या भांडणात आघाडीचा संसार विस्कटेल अशी स्थिती नाही. तथापि, यानिमित्ताने आघाडीत आलबेल नाही, हे स्पष्ट झाले आहे.
औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा उपस्थित होण्याचे कारण म्हणजे लवकरच होऊ घातलेली औरंगाबाद महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक. औरंगाबाद शहराला छत्रपती संभाजीराजे यांचे नाव देण्याची शिवसेनेची जुनी मागणी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा ही मागणी केली. तेव्हापासून शिवसेनेत औरंगाबादचा उल्लेख हा संभाजीनगर असा केला जातो. शिवसेनेने गेली 30 वर्षे औरंगाबादची निवडणूक नामांतराच्या मुद्यावरच लढवली आणि यश मिळवले. आता राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना औरंगाबादच्या नामांतराच्या मागणीने उचल खाल्ली आहे आणि विरोधी पक्ष भाजपने त्याला हवा दिली आहे. नामांतराच्या मुद्यावर आघाडीत फूट पडावी, असा भाजपचा प्रयत्न आहे.
1995 साली राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते, त्यावेळी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी औरंगाबादच्या नामांतराचा प्रस्ताव आणून त्याची अधिसूचना काढली होती. काँगेसने अधिसूचनेला न्यायालयात आव्हान दिले होते. पुढे 1999 मध्ये युतीची सत्ता गेली आणि हा प्रस्ताव बारगळला. 2014 मध्ये भाजपच्या नेतफत्वाखाली सरकार होते. तेव्हाही भाजपने औरंगाबादचे नाव बदलण्याचे धाडस केले नाही आणि सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेही आपली मागणी रेटली नाही. आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून औरंगाबादच्या नामांतराची मागणी पुढे आली आहे. या मागणीला शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनुकूलता दाखवली आहे. गेल्या आठवडय़ात मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भात निर्णय झाला. मुख्यमंत्री कार्यालयाने या निर्णयाची माहिती आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देताना औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला. हा उल्लेख काँगेसला चांगलाच खटकला. महसूल मंत्री तथा काँगेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यातील आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते. भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतराला आमचा ठाम विरोध असल्याचे ट्विट थोरात यांनी लगेच केले. कोणत्याही शहराचे नामांतर हा आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही, असेही थोरात यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँगेसही औरंगाबादच्या नामांतराला फारशी अनुकूल नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नामांतराच्या मागणीवर आघाडीचे नेते चर्चा करून मार्ग काढतील, असा सावध पवित्रा घेतला आहे.
गेले वर्षभर औरंगाबाद शहर किंवा जिह्याशी संबंधित राज्य सरकारने अनेक निर्णय घेतले. मात्र सरकार दप्तरी औरंगाबादचा उल्लेख कधीही संभाजीनगर असा नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विटरवर माहिती देताना अनवधानाने चूक झाली असावी असा काँगेसचा समज होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी 24 तासात हा समज खोटा ठरवला. औरंगजेब सेक्युलर नव्हता. त्यामुळे आघाडीच्या अजेंडय़ात जो सेक्युलर शब्द आहे त्यात औरंगजेब बसत नाही, अशा शब्दात ठाकरे यांनी शिवसेनेची पर्यायाने सरकारची भूमिका स्पष्ट केली. ट्विटरवर जे काही केले त्यात मी नवीन असे काय केले आहे असा प्रतिप्रश्नही ठाकरे यांनी केला आहे. त्यामुळे तूर्तास औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा आघाडीसाठी अडचणीचा बनला आहे.
खरेतर याआधी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीवरून औरंगाबादने आणि मराठवाडय़ातील जनतेने खूप काही भोगले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नामांतरावरून जाती धर्मात तेढ निर्माण होऊन दोन समाजात उद्रेक नको, ही सर्वांची भावना आहे. कोणतीही कटुता निर्माण न होता सहमतीने नामांतर होणार असेल तर त्याला विरोध असण्याचे कारण नाही. पण महापुरुषांच्या नावाचा वापर करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे वर्षानुवर्षाचे उद्योग बंद व्हायला हवेत. नागरीकरणाच्या रेटय़ात महानगराच्या समस्या जटिल बनल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर दर पाच वर्षांनी अस्मितेच्या आधारे राजकारण करून आपले अपयश झाकून ठेवण्याचे राजकीय पक्षांनी आता थांबवले पाहिजे. अस्मिता आणि प्रतीकांचा वापर करून शहरांचे प्रश्न सुटत नसतात याचे भान राजकीय पक्षांना नसले तरी सध्याच्या नव्या पिढीला आहे. भावना आणि अस्मितेपेक्षा विकासाच्या मुद्यावर, मूलभूत प्रश्नांवर निवडणूक व्हावी, अशी तरुण पिढीची अपेक्षा आहे. या अपेक्षांना राजकीय पक्षांनी प्रतिसाद दिला तर शहरातील वातावरण गढूळ होणार नाही.
औरंगाबाद महापालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. तरीही निवडणुकीच्या निमित्ताने आघाडीतील घटक पक्ष आपला मूळ अजेंडा राबवू पाहत आहेत. आपला पक्ष काँगेस, राष्ट्रवादीसोबत असला तरी आपण हिंदुत्व सोडलेले नाही हे उद्धव ठाकरे यांना दाखवून द्यायचे आहे. त्यामुळे ते जाणीवपूर्वक औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करत आहेत, तर नामांतराला विरोध दाखवून काँगेसला मुस्लिम मतदारांची मर्जी राखायची आहे. औरंगाबादच्या नामांतराला राजकीय किनार आहे. या पार्श्वभूमीवर नामांतरावरून आघाडीत निर्माण झालेली कटुता दूर करण्यासाठी आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनाच पुढाकार घ्यावा लागेल असे दिसते.
प्रेमानंद बच्छाव