आमदार अनिल बाबर व तानाजीराव पाटील यांच्यामुळे अनेक वर्षाचा प्रश्न निकाली – अमोल मोरे
वार्ताहर / दिघंची
शेतकऱ्यांच्या मागणीनंतर दिघंचीमधील गिड्डेवस्ती येथे बंधारा झाला परंतु या बंधाऱ्याला गळती सुरू झाली. बंधारा केल्यापासून या बंधाऱ्यात पाणीच आडले नाही व हा बंधारा कधीच पूर्ण क्षमतेने भरला नाही. त्यामुळे असुन अडचण आणि नसून खोळंबा अशी अवस्था या बंधाऱ्याची झाली होती. परंतु आमदार अनिलभाऊ बाबर आणि तानाजीराव पाटील यांच्या पुढाकाराने या बंधाऱ्याची गळती काढण्यात आली त्यामुळे यावर्षी गिड्डे वस्ती बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे.
गिड्डे वस्ती बंधाऱ्याला गळती असल्याने पाऊसाचे पाणी वाहून जात होते. त्यामुळे बंधारा असून देखील त्याचा या परिसरसतील शेतकऱ्यांना फायदा होत नव्हता. या बंधाऱ्याची गळती काढण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांनी अनेक वेळा मागणी केली परंतु त्याला यश आले नाही. त्यानंतर संबंधित काम पूर्ण व्हावे या मागणीसाठी सरपंच अमोल मोरे यांच्यासह सागर ढोले, मुन्नाभाई तांबोळी, बाळासाहेब होनराव आदींनी आमदार अनिलभाऊ बाबर, तानाजीराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला.
गिड्डे वस्ती बंधाऱ्याची गळती काढण्याचे काम झाल्यानंतर आज गिड्डे वस्ती बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे या भागात उसाच्या पिकासह केळी, डाळिंब, द्राक्ष या पिकांची देखील लागवड करण्यात आली आहे. हा बंधारा पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे ढोले मळा, मोरे वस्ती, गिड्डे वस्ती, काळा पट्टा, नळ मळा या परिसरातील शेकडो हेकटर शेतजमीन ओलिताखाली येणार आहे.त्यामुळे या बंधाऱ्याच्या गळतीचा प्रश्न निकाली निघाल्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
आमदार अनिलभाऊ बाबर आणि तानाजीराव पाटील यांच्यामुळे गिड्डे वस्ती बंधाऱ्याच्या गळतीचा प्रश्न कायमचा मार्गी लागला असून या बंधाऱ्यात साठणाऱ्या पाण्याने हा परिसर सुजलाम सुफलाम होणार असल्याचे मत सरपंच अमोल मोरे यांनी व्यक्त केले.