प्रतिनिधी / जोयडा
अनमोड (ता. जोयडा) येथे वाघाच्या हल्ल्यात पुन्हा एका बैलाचा बळी गेला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. दोन महिन्यात तीन बैलांचा बळी गेला आहे. या घटनेची नोंद कॅसलरॉक वन्य वलय कार्यालयात झाली आहे.
अनमोड येथील शेतकरी फोंडू गोविंद गावकर दररोज प्रमाणे आपली गुरे चरावयास सोडली होती. संध्याकाळी सर्व गुरे घरी परतली. मात्र एक बैल आला नाही. शनिवारी सकाळी अरण्य प्रदेशात शोध घेतला असता सदर बैल मृत अवस्थेत आढळून आला. वाघाने या बैलावर हल्ला करून ठार मारून त्याचे थोडे मांस भक्षण केल्याचे स्पष्ट दिसून आले आहे.
याची माहिती कॅसलरॉक वन्यजिवी वलय कार्यालयास माहिती दिल्यानंतर येथील आरएफओ बसवराज यांनी भेट देऊन पाहणी व पंचनामा केला.
अनमोड, मारसंगळ, जळक्याटी, मेडा, वरलेवाडी, आकेती, बरलकोड, पायसवाडी या भागात वाघाचा धुमाकूळ गेल्या एक वर्षापासून सुरू आहे. ही सर्व गावे आकेती ग्रा. पं. व्याप्तीमध्ये व कॅसलरॉक वन्यजीवी वलय कार्यालयांतर्गत येतात. येथील गाय, म्हैस, बैल व रेडय़ांचा बळी या वाघाने घेतला आहे. 15 हून अधिक पाळीव जनावरांचा बळी गेलेला आहे. शेतकऱयांना लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाई देण्यात मात्र दांडेली वन्यजीवी विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. यामुळे शेतकरी बांधवांतून संताप व्यक्त होत आहे.
ग्रा. पं. सदस्य गुराप्पा हणबर म्हणाले, वाघाच्या हल्ल्यात बळी पडलेले बैल, रेडे यांची सध्याची किंमत 40 ते 50 हजार रुपये होते. त्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी गुराप्पा हणबर यांनी केली आहे. यावेळी श्रीनाथ मळीक, उत्तम गावकर व संदीप यडवी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.