प्रतिनिधी / बेंगळूर
राज्य मंत्रिमंडळ विस्तार होऊन सात दिवस उलटले तरी नूतन मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे खातेवाटपाला का विलंब होत आहे, अशी विचारणा होत असतानाच मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी गुरुवारी नूतन मंत्र्यांना खातेवाटप करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे खातेवाटपाबरोबरच खातेबदल होईल का?, याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे.
बेंगळूर येथे पत्रकारांशी ते बोलत होते. खातेवाटपाबाबत बुधवारी मंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीत चर्चा झाल्यानंतर गुरुवारी मंत्र्यांना खातेवाटप केले जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे खातेवाटपासाठी मुहूर्त निश्चित झाला आहे. त्यामुळे कोणाला कोणते खाते मिळेल, याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
अनेक महिन्यांनंतर मागील आठवडय़ात मंत्रिमंडळ विस्तार करून 7 जणांना संधी देण्यात आली होती. ज्येष्ठ आमदार उमेश कत्ती, मुरुगेश निराणी, अरविंद लिंबावळी, एस. अंगार, एम. टी. बी. नागराज, आर. शंकर आणि सी. पी. योगेश्वर यांना कॅबिनेट दर्जाची मंत्रिपदे देण्यात आली होती. त्यानंतर दोन दिवसांनी येडियुराप्पा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कर्नाटक दौऱयानंतर खातेवाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. 16 जानेवारी आणि 17 जानेवारी रोजी अमित शहा राज्य दौऱयावर होते. त्यांनी मंत्रिपदे न मिळालेल्या असंतुष्ट आमदारांना पक्षविरोधी विधाने न करण्याची ताकिद दिली होती. तरी सुद्धा काही जणांनी त्याची दखल न घेता मंत्रिमंडळ विस्ताराविषयी नाराजी व्यक्त करणे सुरुच ठेवले आहे.
दरम्यान, येडियुराप्पा यांनी गुरुवारी नूतन मंत्र्यांना खातेवाटप करणार असल्याचे सांगितले आहे. बुधवारच्या बैठकीत कोणाला कोणते खाते द्यावे, याविषयी निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.