दोन दिवसांत निर्णय घेण्याचे शिक्षणमंत्र्यांचे संकेत
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोना परिस्थितीमुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष विलंबाने सुरू झाले आहे. अजुनही राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा पूर्ण प्रमाणात सुरू झालेल्या नाहीत. शाळांबरोबरच पालकांनाही कोरोना परिस्थितीचा फटका बसला आहे. त्यामुळे खासगी शाळांनी विद्यार्थ्यांकडून किती शुल्क जमा करावे यासंदर्भात गोंधळ निर्माण झाला असून येत्या दोन दिवसांत निर्णय घेण्याचे संकेत शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिले
आहेत.
शुल्क वसुली संदर्भात अलिकडेच खासगी शाळा व्यवस्थापन संघटना आणि पालक संघटनेशी शिक्षण खात्याच्या अधिकाऱयांनी चर्चा केली आहे. त्यानंतर शिक्षण खात्याने राज्य सरकारकडे अहवाल सादर केला आहे. त्यानुसार खासगी शाळांनी यंदा किती शुल्क जमा करावे, यासंबंधीचा आदेश सरकार देणार आहे.
कोरोना परिस्थितीमुळे पूर्ण प्रमाणात शुल्क जमा करण्यास पालकांनी आक्षेप घेतल्याने किती टक्के शुल्क वसुली करावी, याबाबत गेंधळ निर्माण झाला होता. त्यावर तोडगा काढण्यासाठी सार्वजनिक शिक्षण खात्याचे आयुक्त अन्बुकुमार यांनी पालक आणि खासगी शाळा प्रमुखांची बैठक घेऊन शुल्काबाबत सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केला आहे. खासगी शाळांना फटका बसणार नाही अशा तऱहेने आणि विद्यार्थी-पालकांना आर्थिक भार ठरणार नाही, अशा पद्धतीने शुल्क वसुलीचे प्रमाण निश्चित करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे.
आपल्या पाल्याचे शुल्क सरकारनेच जमा करावे, अशी मागणी यापूर्वी पालक संघटनेने केली होती. त्यामुळे सरकारने मागील वर्षी वर्षभरात आकारण्यात येणाऱया शुल्कापैकी निम्मे शुल्क वसुल करण्याची सूचना खासगी शाळांना केली होती. मात्र, काही शाळांनी पूर्ण प्रमाणात शुल्क जमा केल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली होती.