प्रतिनिधी / जयसिंगपूर
विद्यार्थ्यांनी जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हायला हवे. विद्यार्थ्यांकडे ज्ञानासोबत कौशल्य सुद्धा असणे गरजेचे आहे. कौशल्य विकास हा शैक्षणिक क्षेत्रातील मूलभूत कणा आहे. विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा ध्यास घेऊन संशोधन प्रकल्पाद्वारे समाजउपयोगी संशोधन करावे तसेच नैतिक मूल्ये जोपासून चांगले नागरिक बनणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के यांनी केले. संजय घोडावत विद्यापीठाच्या दुसऱ्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत हे होते.
डॉ.शिर्के पुढे म्हणाले” संजय घोडावत विद्यापीठ आज आंतरराष्ट्रीय स्तरावर नावारूपास आलेले विद्यापीठ आहे. पूर व कोविड यासारख्या कठीण काळात या विद्यापीठाने समाजहित जोपासून आपल्या सामाजिक कार्याचा संदेश दिला आहे. या विद्यापीठाने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गजांना एसजीयु आयकॉन पुरस्कार देऊन गौरविले आहे.या सर्व गोष्टीसाठी एका उत्कृष्ट नेतृत्वाची गरज असते आणि ते नेतृत्व म्हणजे संजयजी घोडावत. येणाऱ्या काळात शिवाजी विद्यापीठाकडून लागेल ती मदत करू असे आश्वासन ही दिले.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष श्री.संजयजी घोडावत, विश्वस्त श्री.विनायक भोसले, कुलगुरू डॉ.एम.टी.तेलसंग, कुलसचिव डॉ.एन.के.पाटील, परीक्षा नियंत्रक डॉ.श्रीनिवास बाळकुंडी, श्री. पी.ए.देसाई, डॉ.यु.पी.जाधव, डॉ.ए.डी.सावंत, डॉ.आबिद सलाती, प्रा.संजयकुमार इंगळे, डॉ.वाय.एल. गिरी आदी मान्यवर उपस्थित होते.