वार्ताहर / शिरगुप्पी
गेल्या काही दशकात पाण्याचा व रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. सुपीक, समतोल, पोतयुक्त जमिनीचे आरोग्य सांभाळण्यासाठी प्रत्येक शेतकऱयाने आपल्या शेतातील मातीचे परीक्षण करून घ्यावे, असे आवाहन येथील रयत संपर्क केंद्राचे मुख्य कृषी अधिकारी के. डी. बिरादार यांनी केले.
लोकूर येथील भगत मळा विठ्ठल मंदिराच्या सभागृहात कर्नाटक शासनाच्या जमीन सुस्थीर अभियान मेळाव्याअंतर्गत कृषी रयत संपर्क केंद्राच्यावतीने शेतकऱयांसाठी माती परीक्षण प्रशिक्षण मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. बिरादार म्हणाले, सध्या आपण जमिनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून शेती करीत आहे. त्यामुळे भविष्यात शेतजमिनीचा पोत खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱयांनी वेळीच सावध होऊन माती परीक्षण करून घेतल्यास ते उपयोगी ठरेल. यासाठी प्रत्येक शेतकऱयाने रयत संपर्क केंद्राचा सल्ला घ्यावा, असे सांगितले. यावेळी कृषी अधिकारी महांतेश नरगट्टी, साहाय्यक कृषी अधिकारी व्ही. के. कांबळे, प्रवीण देसाई, महादेव कोळेकर, मुख्याध्यापक एम. जी. संकपाळ, सचिन गावडे, निवृत्ती भगत, मधूकर भगत यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.