खानापूर तालुक्यातील वारकऱयांची मागणी
प्रतिनिधी / खानापूर
लेंढा-मिरज-पंढरपूर रेल्वे सुरू करावी, अशी मागणी खानापूर तालुक्यातील वारकरी वर्गाकडून केली जात आहे. लॉकडाऊनपूर्वी बेळगाव-मिरज-पंढरपूर अशी रेल्वे सुरू करण्यात आली होती. पण लॉकडाऊन काळात ती बंद करण्यात आली. खानापूर तालुक्यात वारकऱयांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. त्यांना पंढरपूरला जाण्यासाठी बस किंवा इतर वाहनाने बेळगावला जावून बेळगाव-मिरज-पंढरपूर रेल्वेचा आधार घ्यावा लागत होता. आता पुन्हा ती रेल्वे सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. पण खानापूर तालुक्यातील वारकऱयांची संख्या लक्षात घेऊन बेळगावऐवजी ती लोंढा-बेळगाव-मिरज-पंढरपूर अशी रेल्वे सुरू झाल्यास बेळगावबरोबरच खानापूर तालुक्यातून पंढरपूरला जाणाऱया वारकऱयांचीही चांगली सोय होऊ शकेल.
कोरोनामुळे 22 मार्च 2020 पासून रेल्वेसेवा बंदच झाली. त्यानंतर 1 जूनपासून टप्प्याटप्प्याने रेल्वे सुरू झाल्या. मात्र, अद्याप बेळगाव-पंढरपूर रेल्वेसेवा सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांना पंढरपूरला जाण्यासाठी हुबळी येथून किंवा खासगी बसने प्रवास करावा लागत आहे. यामुळे आर्थिक नुकसान व वेळेचा अपव्यय होत आहे.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर हुबळीमार्गे अनेक रेल्वे सुरू झाल्या आहेत. मात्र, अद्याप पंढरपूर रेल्वे सुरू झाली नाही. त्यामुळे ही रेल्वे पुन्हा सुरू करावी व ती बेळगावऐवजी लोंढय़ाहून सुटण्याची सोय करावी, अशी मागणी होत आहे.