एकीकडे भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढलेली आहे. तर दुसरीकडे जनतेचे महागाईमुळे जगणे मुश्कील झाले आहे. पेट्रोल व गॅस सिलिंडरचा दर वाढतच चालला आहे. त्यामुळे साहजिकच जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस या दोन्ही पक्षांत सध्या अस्वस्थता आहे. काँग्रेसमध्ये तर मूळ काँग्रेसजन आणि उपरे हा वाद संपता संपेना. आता तर माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या व पक्षाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यातील अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. सिद्धरामय्या मूळचे म्हैसूरचे. गेल्या आठवडय़ात म्हैसूर महानगरपालिकेची महापौर-उपमहापौर निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसला महापौरपद मिळायला हवे होते. देवेगौडा व कुमारस्वामी यांच्या खेळीमुळे काँग्रेसचे महापौरपद हुकले. म्हैसूरला निजदचा महापौर झाला तर उपमहापौरपदावर काँग्रेसला समाधान मानावे लागले. सिद्धरामय्या यांना डिवचण्यासाठीच म्हैसूरमध्ये ही युती साकारण्यात आली आणि ठरल्याप्रमाणे या युतीवर सिद्धरामय्या पार भडकले आहेत. या निवडणुकीला इतके महत्त्व का प्राप्त झाले? तर सिद्धरामय्या यांच्या राजकीय अस्तित्वाला सुरुंग लागल्यानेच ते आक्रमक झाले आहेत. निजदमधून बाहेर पडल्यानंतर अहिंद संघटनेचे मेळावे भरवत आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवणाऱया सिद्धरामय्या यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आली. नंतरच्या निवडणुकीत तर भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी निजदबरोबर युती करावी लागली. बेळगाव जिल्हय़ाच्या राजकीय संघर्षाच्या परिणाम स्वरुप काँग्रेस-निजदच्या युती सरकारचे पतन झाले. केवळ हायकमांडचे मन राखण्यासाठी सिद्धरामय्या या युतीवर गप्प होते. काँग्रेस-निजदमधील 17 आमदार ‘ऑपरेशन कमळ’च्या गळाला लागले. त्यामुळे भाजप पुन्हा सत्तेवर आला, हा इतिहास आहे. काँग्रेस सध्या विरोधी पक्षात असला तरी पुढचा मुख्यमंत्री कोण यावरून सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात मोठा संघर्ष रंगला आहे. सिद्धरामय्या हेच कर्नाटकाचे पुढचे मुख्यमंत्री असतील, असे त्यांचे समर्थक उघडपणे बोलू लागले आहेत. तर शिवकुमार यांचे समर्थकही याबाबतीत मागे नाहीत. शिवकुमार हेच पुढील मुख्यमंत्री आहेत, असा प्रचार त्यांनीही सुरू केला आहे. या संघर्षातूनच सिद्धरामय्या यांना धक्का देण्यासाठी त्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन म्हैसूरमध्ये निजदबरोबर युती करण्यात आली आहे.
या युतीमुळे सिद्धरामय्या आपल्याच पक्षनेतृत्वावर सध्या नाराज आहेत. एकीकडे तर त्यांनी राजकीय निवृत्तीची भाषा केली आहे. म्हणून त्यांची मनधरणी करण्यासाठी कर्नाटकाचे यापूर्वीचे प्रभारी वेणुगोपाल व सध्याचे प्रभारी रणदीपसिंग सूरजेवाला यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या ताठर भूमिकेमुळे म्हैसूरचे आमदार तन्वीर सेठ यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी आपण हा निर्णय घेतला आहे, अशी भूमिका तन्वीर सेठ यांनी मांडली आहे. खरेतर सी. एम. इब्राहिम, तन्वीर सेठ आदी अनेक मुस्लीम नेते यापूर्वी सिद्धरामय्या यांना मानत होते. आता तर तन्वीर सेठ यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, या भूमिकेवर सिद्धरामय्या अडून बसले आहेत. म्हणून त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. पक्षाध्यक्ष डी. के. शिवकुमार मात्र तन्वीर सेठ यांच्यामागे आहेत. दोन्ही गट एकमेकांवर आरोप करीत आहेत. काँग्रेसला कर्नाटकातील घडामोडी डोकेदुखीच्या ठरू लागल्या आहेत.
हा संघर्ष विकोपाला जाण्याची शक्मयता आहे. साहजिकच त्याचा फटका पक्ष संघटनेला बसणार आहे. दक्षिणेतील सत्ता काँग्रेसने गमाविली आहे. कसेबसे कर्नाटकात तरी सत्तेवर येण्याचे पक्षाचे स्वप्न आहे. त्यामुळेच अनेक केंद्रीय नेत्यांनी सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा करत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे. अजून तरी सिद्धरामय्या ताठर आहेत. अशीच परिस्थिती भाजपचीही आहे. मंत्रिमंडळ विस्तारात ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही, त्या असंतुष्टांनी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्यावर शरसंधान सुरू केले आहे. माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी तर पंचमसाली आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांवर गंभीर स्वरुपाची टीका केली आहे. हायकमांडने त्यांना दिल्लीला बोलावून समज दिल्यानंतरही टीकेची झोड त्यांनी थांबवलेली नाही. एकीकडे पंचमसाली आंदोलनामुळे येडियुराप्पा यांची संकटे वाढलेली असतानाच पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यावर झालेल्या अश्लील सीडीच्या आरोपामुळेही पक्षाला धक्का बसला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरू होण्याच्या दोन दिवस आधी रमेश जारकीहोळी यांच्यावर गंभीर स्वरुपाचा आरोप झाला. नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा देतानाच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अश्लील सीडी प्रकरणाची सत्यासत्यता बाहेर पडण्याची गरज आहे. कारण खासगी वाहिन्यांवर प्रसारित करण्यात आलेल्या सीडीतील संभाषण लक्षात घेता हा ‘हनीट्रप’चा प्रकार असल्याचा संशय बळावतो. त्यामुळेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
एकीकडे भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढलेली आहे. तर दुसरीकडे सर्वसामान्य जनतेचे महागाईमुळे जगणे मुश्कील झाले आहे. पेट्रोल व गॅस सिलिंडरचा दर वाढतच चालला आहे. त्यामुळे साहजिकच जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. या महागाईत सर्वसामान्यांसमोर कसे जगायचे हा मोठा प्रश्न आहे. कोरोना महामारीमुळे झालेले लॉकडाऊन, अनेक कंपन्यांनी केलेली कामगार कपात, आर्थिक मंदीमुळे कोटय़वधी लोकांवर आलेली बेरोजगारीची वेळ भयावह आहे. गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांची आर्थिक गणिते कोलमडू लागली आहेत. त्यांच्यासमोर पुढे कसे जगायचे हा प्रश्न मोठा आहे तर राजकीय नेत्यांना आपले अस्तित्व कसे टिकवायचे याचा प्रश्न पडला आहे.