आज उमेदवारी मागे घेण्याचा दिवस : सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील पाच पालिका निवडणुकीसाठी आलेल्या अर्जांची छाननी पूर्ण झाली असून छाननीअंती सर्व 5 पालिकांचे मिळून एकूण 438 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत. आज मंगळवारी दि. 9 मार्च रोजी अर्ज मागे घेण्याचा दिवस असून सायंकाळपर्यंत निवडणूक चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या 5 पालिकांच्या निवडणुकीचे भवितव्य आज दि. 9 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवर अवलंबून आहे.
छाननीनंतर म्हापसा पालिका – 97 उमेदवारी अर्ज, मडगांव पालिका – 111 उमेदवारी, केपे – 54, सांगे – 43 तर मुरगांव पालिकेत – 133 उमेदवारी अर्ज ग्राह्य झाले आहेत. काही उमेदवार आज मंगळवारी अर्ज मागे घेणार असल्याने अर्जांची संख्या कमी होणार आहे.
वरील 5 पालिकांच्या निवडणूक प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने स्थगिती दिली. ती स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेश (स्थगिती) देऊन उठवल्यानंतर पुन्हा निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यात आली तथापि आज मंगळवारी त्यावर सुनावणी करुन सर्वोच्च न्यायालय अंतिम निकाल देणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.