सार्वजनिक बांधकाम विभाग उदासीन
प्रतिनिधी / सावंतवाडी
सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून शासनाने जाहीर केला आहे. याला अनेक वर्षे झाली. पण पर्यटन क्षेत्र असलेल्या स्वच्छ, सुंदर अशा सावंतवाडी शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गोवा व सावंतवाडी शहर मार्गावर जाणाऱया रस्त्यावर ठळक अक्षरातील दिशादर्शक फलक लावलेले नाहीत. येणाऱया व जाणाऱया पर्यटकांना सावंतवाडी शहर व गोवा कुठे आहे, असे विचारण्याची वेळ येत आहे. त्यामुळे बरेच पर्यटक सावंतवाडीत न येता आपल्या घरचा मार्ग धरतात. पालकमंत्री, आमदार, खासदार व राजकीय पदाधिकारी फक्त राजकारण करत पर्यटनाबाबत उदासीन असल्याचा आरोप सावंतवाडी-चितारआळी येथील ज्येष्ठ नागरिक सुभाष चितारी यांनी केला आहे.
सावंतवाडी शहर पर्यटन शहर आहे. येथील लाकडी खेळणी प्रसिद्ध आहेत. नरेंद्र डोंगर, मोती तलाव, राजवाडा आदी बरीच पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळेच सावंतवाडीची ओळख देशभरात पोहोचली आहे. देश-राज्यातून बरेच पर्यटक सावंतवाडीत येण्यास निघतात. शहरापासून गोवा पर्यटन राज्य 60 कि. मी अंतरावर आहे. पर्यटक सावंतवाडीत पर्यटनाचा आनंद लुटून गोवा सफर करतात. पण गेल्या चार वर्षापासून शहरातून जाणाऱया महामार्गावर दिशादर्शक फलक गंजलेल्या अवस्थेत, पर्यटकांना नजरेत पडू नये, अशा ठिकाणी लावले आहेत. आंबोलीमार्गे सावंतवाडीत येणारे पर्यटक, मुंबईहून येणारे व गोव्याहून सावंतवाडीत येणाऱया पर्यटकांना सावंतवाडी शहर कुठे आहे? गोवा कुठे आहे, असे विचारण्याची वेळ येत आहे. चिटणीस नाका, गवळी तिठा, तीन मुशी या ठिकाणी फलक लावण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग उदासीन आहे. येत्या आठ दिवसात ठळक फलक न लावल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांना जाब विचारण्यात येईल, असा इशारा चितारी यांनी दिला.
फुटपाथची दुरवस्था शहरातून जाणाऱया गवळी तिठा ते चिटणीस नाकादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने पाच वर्षांपूर्वी फुटपाथ केला. मात्र, गटारावर टाकलेल्या सिमेंटच्या फरशा तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, पादचाऱयांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. |