प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार हा शेवटचा दिवस होता. मंगळवारी भाजप, शिवसेना यासह इतर अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. 13 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. आता 31 मार्च रोजी अर्जाची छाननी होणार आहे.
शनिवार दि. 3 एप्रिल रोजी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. 31 मार्च रोजी छाननी झाल्यानंतर प्रचाराला वेग येण्याची शक्मयता आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 13 उमेदवारांनी 18 उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. भाजप उमेदवार मंगला अंगडी यांनी 4 उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, शिवसेनाकडून के. पी. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच अपक्ष म्हणून संगमेश चिक्कनरगुंड, गौतम कांबळे, अप्पासाब कुरणे, सुरेश परगणावर, कल्लाप्पा कार्लेकर, गोळाप्पा मेटी, दयानंद चिक्कमठ, भारती चिक्कनरगुंड, गंगाप्पा नागनुरी (सर्व अपक्ष) तर सुरेश मार्लिंगनावर (कर्नाटक कार्मिक पक्ष) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
भाजप, काँग्रेस, महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना यांच्यावतीने अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर काही अपक्षांनीही आपले अर्ज दाखल केले आहेत.
मंगळवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही मोजक्मया व्यक्तींनाच आत प्रवेश देण्यात येत होता.
मंगला अंगडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल
दरम्यान बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपतर्फे मंगला अंगडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, मंत्री ईश्वराप्पा, केंद्रिय मंत्री प्रल्हाद जोशी, गोविंद कारजोळ, जगदीश शेट्टर आणि राज्य प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटिल या दिग्गजांच्या उपस्थितीत हा अर्ज दाखल करण्यात आला आहे.
भारतीय जनता पार्टीतर्फे मंगळवारी अर्ज दाखल होणार असल्यामुळे जिल्हाधिकारी परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारी 12 च्या सुमाराला भाजपचे नेते मंडळी दाखल झाले. त्यानंतर मंगला अंगडी यांनी तीनवेळा आपला अर्ज दाखल केला आहे.
निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांच्याकडे गोविंद कारजोळ आणि के. एस. ईश्वराप्पा तसेच केंद्रिय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत एक अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, राज्य प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटिल यांच्या उपस्थितीत एक अर्ज दाखल करण्यात आला तर आमदार अनिल बेनके यांच्या उपस्थितीत एक अर्ज असे एकूण तीन अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यावेळी काही मोजक्मयाच नेते मंडळींना आत प्रवेश देण्यात आला.
गांधीभवन येथे सभा घेऊन त्यानंतर काही मोजकेच कार्यकर्ते आणि नेते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आले. त्यानंतर हे अर्ज दाखल केले आहेत.
मंगला अंगडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना मंत्री उमेश कत्ती, महिला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री शशिकला ज्वोल्ले, शंकरगौडा पाटील, आमदार महांतेश कवटगीमठ, आनंद मामनी, बेळगाव जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष संजय पाटील, किरण जाधव यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
के.पी.पाटील यांनी दाखल केला अर्ज
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे के. पी. पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी मंगळवारी आपल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक अधिकारी डॉ. हरिशकुमार यांच्याकडे त्यांनी आपला अर्ज दिला आहे. मंगळवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे विविध राजकीय पक्षांनी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेनेतर्फे के. पी. पाटील यांनी अर्ज दाखल केला. यावेळी त्याच्यासोबत संपर्क प्रमुख अरविंद नागनुरी हे उपस्थित होते.
मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी
कित्तूर चन्नम्मा ते आरटीओपर्यंत वाहतुकीची कोंडी वारंवार होत होती. यातच काही वाहने रस्त्यावर पार्किंग करण्यात आली होती. ती वाहने टुईंग यंत्राद्वारे पोलिसांनी जप्त केली. वाहतुकीची कोंडी होत असताना एकमेकांवर वाहने धडकण्याचा प्रकार देखील घडला. यामुळे वादावादीही झाली. एकूणच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मंगळवारी मोठी गर्दी उसळली होती. मात्र पोलिसांनी बरेच निर्बंध घातल्यामुळे अनेक जण रस्त्यावरच थांबून होते.
न्यायालयाकडे ये-जा करणारे तसेच इतर कामांसाठी आलेल्या नागरिकांना त्याचा फटका बसला. चालत ये-जा करण्यासही मज्जाव करण्यात येत होता. त्यामुळे अनेकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.