नगराध्यक्षानी मानले दै.‘तरुण भारत’चे आभार
वाळपई/ प्रतिनिधी
वाळपई नगरपालिका क्षेत्रातील नाणूस बेतकेकरवाडा याठिकाणी साठलेल्या कचऱयावर नगरपालिका पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध होताच नगरपालिकेची यंत्रणा खडबडून जागी झाली. नगराध्यक्ष सेहझीन शेख यांनी गांभिर्याने लक्ष देऊन सदर कचरा ताबडतोब साफ करण्याचे आदेश दिले. एका दिवसामध्ये नाल्यांमध्ये साठलेला कचरा पूर्णपणे साफ करण्यात आला असून यामुळे नागरिकांनी नगरपालिकेचे आभार व्यक्त केलेले आहेत. त्याचप्रमाणे यासाठी विशेष सहकार्य करणारे प्रभागाचे नगरसेवक शेख फैजल यांनाही धन्यवाद व्यक्त केलेले आहेत.
वाळपई नगरपालिकेच्या प्रभाग 5 या ठिकाणी असलेल्या नानुस बेतकेकरवाडा गावांमध्ये जाणाऱया रस्त्याच्या बाजूलाच नाल्यात मोठय़ा प्रमाणात प्लास्टिकचा कचरा साचला होता. या कचऱयावर भटकी गुरे ताव मारीत असल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे या भागातील अनेक गुरे आजारी पडल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. नगरपालिकेला विनंत्या व मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. या संदर्भाची बातमी दैनिक ‘तरुण भारत’मध्ये प्रसिद्ध होताच वाळपई नगरपालिकेची यंत्रणा खडबडून जागी झाली. शनिवारी सदर कचरा साफ करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात कामगार पाठवून हा कचरा पूर्णपणे साफ करण्यात आलेला आहे. या भागांमध्ये पुन्हा कचऱयाचा साठा होणार नाही यासाठी विशेष दखल घेण्यात येणार असल्याचे नगरपालिकेने स्पष्ट केलेले आहे.
दै.तरुण भारतचे आभार – नगराध्यक्ष-सेहझीन शेख
वाळपई नगराध्यक्ष सेहझीन शेख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या संदर्भातील बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर आपण लगेच या ठिकाणी कामगार पाठवून सदर कचरा पूर्णपणे साफ केलेला आहे. अशा प्रकारचा कचरा नगरपालिकेच्या कोणत्याही भागांमध्ये साचलेला असल्यास ताबडतोब नगरपालिकेशी संपर्क साधावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे. त्याचबरोबर दैनिक तरुण भारतने बातमी प्रसिद्ध करून नगरपालिकेचे लक्ष वेधले याबद्दल त्यांनी धन्यवाद व्यक्त केलेले आहेत.
नागरिकांनी उघडय़ावर कचरा टाकू नये – शेख फैझल
नगरसेवक शेख फैजल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बेतकेकरवाडा याठिकाणी जाण्यासाठी छोटासा पूल आहे. सदर पुलावरून नागरिक या ओहोळात कचरा टाकतात. त्यामुळे तेथे मोठय़ा प्रमाणात कचरा साठत असतो. नागरिकांनी कचरा उघडय़ावर न टाकता कचरा कुंडय़ांचा वापर करावा असे आवाहन त्यांनी केलेले आहे. स्वच्छ भारत निर्मल भारत या अभियानांतर्गत प्रत्येकाने आपल्या भागामध्ये स्वच्छता पाळणे ही सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवणे गरजेचे असल्याचे यावेळी ते म्हणाले.