स्वामीनगर, संभाजीनगरातील नागरिकांना करावी लागते भटकंती : टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ : प्रशासनाचे दुर्लक्ष
आण्णाप्पा पाटील / बहाद्दरवाडी
बेळगाव शहराला लागून असणाऱया मच्छे गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. या गावातील स्वामीनगर व संभाजीनगरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गेल्या 6 महिन्यांपासून घरासमोरील नळांना पाणीच नसल्यामुळे टँकरने विकत पाणी घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मच्छे ग्रामपंचायतीचे स्वामीनगर व संभाजीनगराकडे साफ दुर्लक्ष असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून उमटू लागल्या आहेत. 47 ग्रामपंचायत सदस्य असणारी मच्छे ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे अलिकडेच झालेल्या ग्रामपंचायतीचीही निवडणूक येथे झाली नाही. हक्काचे व आपल्या वॉर्डाचे सदस्य नसल्यामुळे आता दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित झाला आहे.
बेळगाव पणजी महामार्गालगत मच्छे हे गाव वसलेले आहे. मच्छे गावच्या खालच्या बाजुला म्हणजेच पूर्वेकडे पाण्याचे स्त्राsत आहे. तर या गावच्या पश्चिमेकडे स्वामीनगर व संभाजीनगरात खोदण्यात येणाऱया कूपनलिकांना म्हणावा तसा पाणी साठा होत नाही. यामुळे अवघ्या काही महिन्यातच कूपनलिका बंद अवस्थेत दिसून येतात.
सद्या कडाक्याचे ऊन पडत असून एप्रिल महिन्याच्या मध्यानंतरच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून येणाऱया दहा-बारा दिवसानंतर याठिकाणची परिस्थिती अतिशय गंभीर होणार असल्याची चिंताही या परिसरातील महिलांना लागून राहिली आहे.
मच्छे गावात दोन मुख्य तलाव आहेत. गावाजवळ असलेला एक तलाव गेल्या दीड-दोन वर्षापूर्वीच प्यास फौंडेशनच्यावतीने पुनःरुज्जीवन करण्यात आले होते. या तलावात सध्या बऱयापैकी पाणीसाठा होऊ लागला आहे. या तलावाजवळ पूर्वीपासूनची एक विहीर आहे. या विहिरीचे पाणी गावच्या काही भागातील गल्ल्यांना पुरविण्यात येते. मात्र हे पाणी संपूर्ण गावाला पुरत नाही, अशी माहितीही स्थानिकांनी दिली आहे.
स्वामीनगर व संभाजीनगरातील नागरिकांना पाण्यासाठी नेहमीच पंचायतीचे दरवाजे खटखटावे लागतात. ही समस्या गेल्या चार-पाच वर्षांपासून सातत्याने जाणवते. संभाजीनगरात असलेली कूपनलिका सध्या पूर्णपणे बंद आहे. या कूपनलिकेच्या बाजूलाच पाण्याची टाकीही उभारण्यात आली आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून इथल्या नळांना पाणीच आले नाही. अशी माहिती काही तरुणांनी दिली आहे.
संभाजीनगर दुसरा क्रॉस येथेही पाणीटंचाई असून या नगरातील नागरिकांना टँकरचाच आधार घ्यावा लागतो. पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनामार्फत योग्य ते नियोजन करून पाणीपुरवठा करून द्यावा, अशी मागणी येथील महिलांनी केली
आहे.
घरासमोरील नळांना पाणी नसल्यामुळे सर्वसामान्य माणसांचे मात्र हाल होऊ लागले आहेत. काही जणांना टँकरचे पाणी घेऊन संसाराचा गाडा चालविणे अवघड होऊ लागले आहे. कोरोना महामारीमुळे आधीच रोजगारातून मिळणाऱया उत्पन्नावर संसारोपयोगी लागणाऱया साहित्याची खरेदी याचा ताळमेळ जमत नाही. अन् अशा परिस्थितीत विकत पाणी घ्यायचे कसे, असेही सर्वसामान्य जनता विचारत आहेत.
बेळगाव-पणजी महामार्गाजवळील चौगुलेनगर येथे असलेल्या एका हँडपंपला पाणी येते. या हँडपंपाचे पाणी नागरिक रोज आणताना दिसतात. मात्र संभाजीनगरापासून चौगुलेनगर अंतर दूर असल्यामुळे महिलांना याचा त्रास होऊ लागला आहे. काहीजण सायकलवरून सकाळी व संध्याकाळी पाणी आणतानाचे चित्र पहावयास मिळते. त्यामुळे पाणी समस्या दूर करण्याची मागणी होत आहे.
अधिकाऱयांनी पाहणी करावी : लक्ष्मी हावळ
स्वामीनगरात पिण्याचे पाणी मिळत नाही. गल्लीत असलेल्या पाण्याच्या टाकीला एक दोन हंडे पाणी तेवढेच मिळते. यानंतर मात्र आम्हाला पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. पाणी आणण्यासाठी महिलांनाच अधिक त्रास होत असून प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी या भागाची पाहणी करून आमच्या नगरामध्ये पिण्याच्या पाण्याची सुरळीत सोय करून द्यावी, अशी आमची मागणी आहे.
विनाकारण अर्थिक भुर्दंड : निकेश गुरव
संभाजीनगरात असलेली कूपनलिका पूर्णपणे बंद आहे. यामुळे काहीजण मिळेल त्या विहिरीचे तर काहीजण शेतशिवारातील कूपनलिका व विहिरीचे पाणी आणतात. सध्या गल्लीतील बहुतांशी लोक टँकरच्या पाण्याचाच उपयोग करतात. आम्हा एका कुटुंबाला पाच ते सहा दिवसातून एक पाण्याचे टँकर घ्यावे लागते. या भागात 250 ते 300 रुपये एका पाण्याच्या टँकरला द्यावे लागतात. पाणीपुरवठा नसल्यामुळे आम्हाला विनाकारण अर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
पीडीओ यांचे दुर्लक्ष : सचिन बेळगावकर
ग्रामपंचायतीमार्फत स्वामीनगर येथे एक पाण्याची टाकी उभारण्यात आली आाहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपूर्वी मच्छे मुख्य रस्त्याचे कामकाज करत असताना त्या ठिकाणची पाईपलाईन खराब झाली. आणि तेव्हापासून या परिसरातील पाण्याच्या टाकीला पाणी येत नाही. मी स्वतः माजी ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळे ग्रामपंचायतीला इथल्या पाणी समस्येबाबत वारंवार कळवित असतो. तरीही पीडीओ यांचे या भागातील नागरिकांकडे दुर्लक्ष झाले आहे.