- रविवारी 66,191नवे रुग्ण; 61,450 डिस्चार्ज
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात काल दैनंदिन रुग्णसंख्येत आणि मृत्यू संख्येतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. राज्यातील दैनंदिन आकडे धडकी भरवणारे ठरले आहेत. दरम्यान, मागील 24 तासात राज्यात तब्बल 832 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला. ही आतापर्यंतची सर्वांत जास्त संख्या आहे. तर 66 हजार 191 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 61 हजार 450 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, मृतांचा वाढता आकडा ही चिंतेची बाब ठरत आहे.
गेल्या 24 तासांतील आकडेवारीवर नजर टाकल्यास राज्यातील स्थिती अधिकच भीषण बनत चालल्याचे दिसत आहे. राज्यातील बाधितांची एकूण संख्या 42 लाख 95 हजार 027 वर पोहोचली आहे. त्यातील 35,30,060 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.19 % आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.51 % इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 6 लाख 98 हजार 354 रुग्ण उपचार घेत आहेत.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 2 कोटी 57 लाख 49 हजार 543 नमुन्यांपैकी 16.68 % रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात लोक होम 32 लाख 36 हजार 825 क्वारंटाईनमध्ये असून, 29 हजार 966 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.