बसस्थानकांवर प्रचंड गर्दी : बेंगळूरमधील मजुरांचे प्रमाण अधिक ; खासगी वाहनांचाही आधार
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकारने विकेंड कर्फ्यूच्या धर्तीवर मंगळवारी रात्री 9 पासून पुढील 14 दिवसांसाठी कर्फ्यू जारी केला आहे. या कालावधीत सर्व व्यवहार बंद असल्याने रोजंदारी करणाऱयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. राज्यभरातून बेंगळूरसह प्रमुख शहरांमध्ये कामानिमित्त आलेल्या अनेक जणांनी सोमवारी रात्रीपासूनच आपापल्या गावी जाण्यासाठी बसस्थानकांवर गर्दी केली. बेंगळूरमध्ये तर अनेकजण आवश्यक साहित्यासह कुटुंबासमवेत गावी परतण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र दिसून आले.
कोरोना नियंत्रणासाठी 14 दिवसांचा कर्फ्यू जारी करणे अनिवार्य असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. या कालावधीत कोरोना नियंत्रणात न आल्यास संपूर्ण लॉकडाऊन जारी करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी विविध भागातून बेंगळूर, मंगळूर, हुबळी, गुलबर्गा, म्हैसूर, दावणगेरे, बेळगाव या प्रमुख शहरांमध्ये आलेले अनेक जणांनी साहित्य बांधून मिळेल त्या वाहनाने गावी परतण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. खासगी प्रवासी वाहनांनी तर अक्षरशः दुप्पट तिकीट दर आकारले. परिवहनच्या बसेसमध्ये जागा मिळत नसल्याने ट्रव्हल्स कंपन्यांच्या खासगी बसेसमधून गाव गाठण्यासाठी मजूरवर्ग धडपडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
लॉकडाऊनची घोषणा होणार असल्याची शक्यता गृहीत धरून अनेक जणांनी आपल्या गावाचा रस्ता धरला. त्यामुळे बेंगळूर, म्हैसूर, मंगळूर, हुबळी येथील बसस्थानकांवर गर्दी झाली होती. काही जणांनी तर मालवाहू वाहनांचा आधार घेतला. सरकारने बांधकाम कामगारांना दिलासा दिला तरी ते कुटुंबासमवेत गावी गावी परतत होते. कामे नसल्याने उमासमारीची वेळ येऊ नये यासाठी गावी परतणेच योग्य असल्याचे अनेकांचे म्हणणे होते. राज्य सरकारने 21 एप्रिल रोजी नाईट कर्फ्यू आणि विकेंड लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर अनेकांनी बसस्थानकाकडे धाव घेतली होती. आयटी कंपन्यांमधील अनेक कर्मचारी देखील घरी परतत असून त्यांना वर्क फ्रॉमचा पर्याय निवडणे अनिवार्य आहे.
उत्तर कर्नाटकातील लोकांची संख्या अधिक
सरकारच्या मार्गसूचीनुसार बसेसमध्ये 50 टक्के प्रवासांनाच मुभा असल्याने परिवहन मंडळाने अतिरिक्त बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बेंगळूरच्या मॅजेस्टीक, सॅटेलाईट, म्हैसूर रोड येथील बसस्थानकांवर सोमवारी प्रचंड गर्दी होती. यामध्ये उत्तर कर्नाटकातील लोकांचे प्रमाण अधिक होते.