लग्न समारंभांतील वाढती गर्दी चिंताजनक : प्रशासनाचे नियम पायदळी : परवानगी 50 जणांना; उपस्थिती मात्र चारशे-पाचशेच्या
पिराजी कुऱहाडे / खानापूर
कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे संपूर्ण देश भीतीच्या छायेखाली वावरत आहे. कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यात कोरोना महामारीला रोखण्यासाठी क्लोजडाऊन नियमावलीला प्रारंभ झाला आहे. गेल्या आठ दिवसांत क्लोजडाऊनमुळे नेहमी गजबजणाऱया शहरातील गर्दीवर नियंत्रण आले आहे. राज्य शासनाने 14 दिवसांचा क्लोजडाऊन आदेश बजावला आहे. त्यामध्ये दि. 4 मेपर्यंत लादण्यात आलेली बंधने आता 12 मेपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱयांनी बजावले आहेत. त्याचे काटेकोरपणे पालन करण्याची सूचना तालुका प्रशासन तसेच पोलीस प्रशासनालाही केली आहे. क्लोजडाऊनच्या नियमावलीवरील लग्न समारंभाला मर्यादा ठेवून परवाना देण्यात आला आहे. त्यामुळे खानापूर तसेच बेळगाव जिल्हय़ात अनेक ठिकाणी लगीनघाई सुरूच आहे. एकीकडे वऱहाडी मंडळींना लगीनघाई असली तरी लग्नासाठी येणाऱया पै-पाहुणे, नातेवाईक मात्र कोरोनाच्या भीतीत अडकले आहेत. त्यामुळे अनेक मित्र परिवार, नातेवाईकांनी लग्नाला जावे की नाही, हा ही विचार आता प्रत्येकाच्या मनात घर करून आहे.
राज्य शासनाने लग्न समारंभाला तहसीलदारांचा परवाना घेऊनच सोहळे पार पाडण्यासाठी अट घातली आहे. पण या अटीचे पालन करताना वऱहाडींनाही कसरत करावी लागत आहे. आता लग्न समारंभात मर्यादा घालूनही वाढणारी गर्दी कोरोना संक्रमणाला बळ देणारी ठरू नये, यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. विवाह समारंभासाठीची ही मर्यादा बंधनकारक असली तरी ग्रामीण भागात पाळली जात आहे का, याचा विचार होणे आता चिंतनीय बनले आहे. मागीलवषी केंद्र व राज्य सरकारने यावर अनेक निर्बंध म्हणून तब्बल 40 दिवसांचा लॉकडाऊन केला. पण पुन्हा या महामारीने दुसरी लाट घेऊन शिरकाव करून हाहाकार माजवला आहे.
आज गावागावात सर्दी, ताप, खोकला अशा आजारांवर अनेक लोक उपचार घेत आहेत. ग्रामीण भागातील डॉक्टर्स अशा लोकांवर उपचार करताना दिसत आहेत. लोक आपल्याला नावे ठेवतील, समाज आपल्याला काय बोलेल, या भीतीपोटी अनेकजण कोरोना टेस्टसाठी दवाखान्याकडे जाण्यास पाठ फिरवत आहेत. परंतु हे कारण आपल्या जीवावर बेतेल याची भीती मात्र लोकांना नाही. अशाच काळात गावागावात होणारे लग्न समारंभ हे त्यामध्ये अधिकच भर घालणारे आहेत. एखाद्या गावामध्ये होणारा विवाह समारंभ व त्या ठिकाणी होणारी गर्दी ही कोरोना संक्रमणाच्या धोक्मयाची-घंटा बनली आहे. घरी उपचार घेणारे लोकही अशा लग्न समारंभाच्या ठिकाणी बेधडकपणे उपस्थित राहत आहेत.
चाकरमानी पुन्हा परतले गावी
चोरटय़ामार्गाने अनेक चाकरमानी गावागावात परतत आहेत. तेही लोक घरामध्ये क्वॉरंटाईन होण्याऐवजी बिनधास्त फिरत आहेत. त्यामुळे खेडय़ापाडय़ात राहणाऱया लोकांच्या जीवावरचा हा खेळ कधी थांबणार, अशी भीती निर्माण झाली आहे. विवाह समारंभांना 50 लोकांची मर्यादा असली तरी प्रत्यक्षात त्या ठिकाणी चार-पाचशे लोक उपस्थित राहताना दिसत आहेत. खेडय़ापाडय़ामध्ये †िववाह सोहळे नियमावलीच्या धास्तीखाली होत असले तरी मुहूर्ताची वेळ वगळून सकाळच्या प्रहरी विवाह उरकण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु गल्लीतील, गावातील काही पाहुणे, दोन्ही वऱहाडीमंडळी एकत्रित आली की त्या ठिकाणी चार-पाचशे लोकांचा गोतावळा जमा होत आहे.
अनेक गावांमध्ये बरेच लोक आजाराने पीडित…
खानापूर तालुक्मयातील अनेक गावांमध्ये आज आजाराने लोक पीडित आहेत. बरेच लोक म्हणतात मला कोरोना झाला नाही. मात्र खासगी डॉक्टरांकडे उपचार घेत आहेत. दोन दिवसात आजार कमी झाल्यानंतर अनेकजण बिनधास्तपणे समाजात फिरताना दिसत आहेत. स्वतःचा आजार झाकून समारंभाच्या ठिकाणी उपस्थिती दर्शवून ते मोकळे होतात. मात्र त्याचा फटका इतर लोकांना नकळत बसतो. ग्रामीण भागासह कार्यालयात होणारे विवाह समारंभ हे कितपत योग्य आहेत, नियमावलींचे पालन केले जात आहे का, याचा विचार होणे गरजेचे आहे.
विवाह सोहळय़ांकडे सुज्ञ नागरिकांची पाठ
विवाह सोहळय़ांना परवाना देण्यात येत असल्याने अनेकजण आपल्या स्वगृही विवाह सोहळे पार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेकांनी मंगल कार्यालयाची वाट धरली होती. परंतु मंगल कार्यालयातील नियमावली व त्या ठिकाणी होणारा नाहक आर्थिक खर्च लक्षात घेता अनेकजण आपल्या दारातच लग्न करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 50 जणांना परवाना देण्यात येत असला तरी या ठिकाणी होणारी वाढती गर्दी धोकादायकच बनत चालली आहे. त्यामुळे लग्न समारंभाला जाण्यासाठी अनेकजण टाळत आहेत. पण सर्वसामान्य, वयस्कर व्यक्ती अशा लग्न समारंभांना मोठय़ा संख्येने उपस्थित राहून आपल्या जीवाशी खेळत आहेत. सध्या विवाह सोहळय़ांना परवाना देणे योग्य आहे का, याचाही प्रशासनाने विचार करण्याची वेळ आली आहे.
खानापूर तालुक्मयामध्ये वर्षभरात 60 हून अधिक जणांचा कोरोनाने बळी
सोमवारपर्यंत खानापूर तालुक्मयामध्ये सहा जणांचा बळी या महामारीने गेला असून गेल्या वर्षभरात जवळपास 60 हून अधिक जण कोरोनाचे बळी गेले आहेत. सध्या तालुक्मयात 150 हून अधिक जण सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. हे फक्त कोरोना टेस्ट केल्यानंतर आढळलेले रुग्ण आहेत. पण प्रत्येक गावामध्ये आजाराने त्रस्त अनेक लोक घरीच उपचार घेत आहेत. यासाठी प्रत्येकाने सतर्कता राखावी, असे आवाहन वारंवार केले जात आहे. पण याकडे समाजाचे दुर्लक्ष असून विवाह समारंभांसारखे कार्यक्रम अशा संक्रमणाला वाव तर देत नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.