विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचा सवाल
प्रतिनिधी / पणजी
गोव्यात काल बुधवारी 71 नवे कोविड रुग्ण दगावले. भाजप सरकारची संवेदनशीलता कधीच मेली आहे. आरोग्यमंत्र्यानी भाकीत वर्तवल्याप्रमाणे 200 ते 300 मृत होण्याच्या दिवसाची सरकार वाट पाहत आहे का? आरोग्यमंत्री विश्वजित राणेंचे भाकीत खरे ठरविण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत कोणतीच कृती न करता वाट पाहत आहेत का, असा खोचक प्रश्न विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी विचारला आहे.
केंद्र व राज्यातील भाजप सरकारला तहान लागल्यावरच विहीर खोदण्याची सवय जडली असून, त्यामुळेच आज ऑक्सिजन पुरवठय़ाची आणिबाणी तयार झाली आहे. रुग्ण व त्यांचे नातेवाईक समाजमाध्यमांवर संदेश टाकून प्राणवायुची मागणी करीत आहेत, हे अत्यंत धक्कादायक आहे.
एप्रिलमध्ये मृत पावलेल्या कोविड रुग्णाची नोंद आज होतेय, यावरुनच सरकार दरबारी सावळागोंधळ चालू असल्याचे दिसते, असेही ते म्हणाले.