कराड / वार्ताहर :
कृष्णा नदीकाठावर असलेल्या आदर्श गावाकडे वाटचाल करणाऱ्या शेरे ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. शेरे स्टेशनवर गेली पाच दिवस पाणी पुरवठा बंद असून याकडे ना ग्रामपंचायत ना प्रशासन पाहत नसल्याने ‘पाणी उशाला आणि कोरड घशाला’ अशी अवस्था झाली आहे. नव्याने सत्तेत आलेल्या पदाधिकाऱ्यांचा पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिक चांगला पाणउतारा करत असल्याचे ऐकू येऊ लागले असून घरटी पुढारी तरी गावात पाण्याची बोंबाबोंब अजून किती दिवस येणार की सुरळीत पाणी पुरवठा होणार, याबद्दल नागरिक संभ्रमात आहेत.
गेली पाच दिवस झाले रेल्वे स्टेशनवर पाणी नसल्याने नागरिक घागरी घेऊन फिरताना दिसतात. या गावात पाण्याचे नियोजन करण्यात कायम अपयश असून याबाबत पंचायत समितीचे अधिकारी सुद्धा कधीच लक्ष घालत नाहीत. पाणी पट्टी वसूली वेळेत होत नसल्याने कधी लाईट बील न भरल्याने कनेक्शन तोडले जाते, गळतीची वारंवार समस्या, नोकरांचा पगार वेळेवर दिला जात नाही, अशी नाना कारणांमुळे पाणी पुरवठ्याची वरचेवर बोंबाबोंब होते. याबद्दल ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना काही जमतं नाही की करायचे नाही हेच नागरिकांना कळले नाही.
सध्या ग्रामपंचायत सांगते विद्युत पुरवठ्याचे कारण तर परिसरात पाणी पुरवठा कर्मचाऱ्याला पगार न दिल्याने तो कामावर आला नसल्याने पाणी नाही, अशी चर्चा सुरू आहे.