अतिपावसामुळे सर्वत्र पाणीचपाणी झाल्याने पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली : झाडे-विद्युत खांब मोडून पडल्याने बहुतांशी गावात वीजपुरवठा खंडित ; जनजीवन विस्कळीत
वार्ताहर / किणये
तालुक्यात रविवारी चक्रीवादळाच्या पावसाने सर्वत्र पाणीचपाणी केले. रविवारी पहाटेपासूनच जोरदार वादळी वाऱयासह पाऊस सुरू झाला. दिवसभर संततधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले. काही मुख्य रस्त्यांवर पाणी आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. शेत-शिवारांमध्ये पाणी साचल्यामुळे मशागतीची कामे खोळंबली आहेत. यामुळे बळीराजा चिंताग्रस्त बनला आहे.
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्टय़ामुळे निर्माण झालेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा फटका रविवारी पहाटेपासून बेळगाव तालुक्याला बसला आहे. वादळी वाऱयाच्या पावसामुळे ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तसेच विद्युत खांबही कोसळले आहेत. यामुळे बहुतांशी गावातील वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे.
पावसामुळे वाहतूक ठप्प
पावसामुळे मच्छे, पिरनवाडी, बेळगुंदी, नावगे, बेळवट्टी, सोनोली आदी ठिकाणच्या मुख्य रस्त्यांवर पाणी आले होते. यामुळे सकाळी 10 पर्यंत सुरू असणारी वाहतूक ठप्प झाली होती. तर काही महत्त्वाच्या वाहनांना परवानगी आहे. अशा वाहनधारकांनाही रस्ता पार करताना कसरत करावी लागत होती.
चक्रीवादळामुळे नागरिक हैराण
सध्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. यामुळे नागरिक अधिक भयभीत झाले आहेत. त्यात आता चक्रीवादळाच्या पावसामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. रविवारी सुरू असलेल्या पावसाने विश्रांती न घेता सततधार सुरूच ठेवली होती. यामुळे शिवारांमध्ये पाणी साचले आहे. सध्या शेतकरी खरीप हंगामासाठी मशागतीची कामे करीत होता. मात्र, जमिनीत पाणी साचल्याने मशागतीची कामे पूर्णतः ठप्प झाली आहेत.
काजू-आंब्याला फटका
तालुक्यात काजू व आंब्याच्या बागायती आहेत. चक्रीवादळामुळे या बागायतींचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळाच्या वाऱयामुळे आंब्याच्या झाडांवरील कच्चे आंबे गळून पडले आहेत. तसेच झाडावरील ओल्या काजू झडून गेल्या आहेत. यामुळे बागायतदार शेतकरी अडचणीत आला
आहे.
आजारांच्या प्रमाणात वाढ
सध्या ग्रामीण भागात सर्दी, ताप, खोकला या आजारांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. बहुतांशी गावांमध्ये या आजारांची साथच आली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यामुळे दवाखान्यांमध्ये अशा किरकोळ आजारांच्या रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढली आहे. कोरोनाचे भय तर साऱयांना आहेच. दोन दिवसापासून हवामानातही कमालीचा बदल झाला आहे. हवामानात गारवा निर्माण झाला असून आजारांच्या प्रमाणात वाढ होणार असल्याची चिंताही साऱयांनाच जाणवू लागली आहे.
वीट व्यावसायिक अडचणीत
देसूर, नंदिहळ्ळी, राजहंसगड या भागात विटांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेण्यात येते. यंदा गेल्या दीड महिन्यापासून वळीव पावसाची अधूनमधून हजेरी सुरू आहे. रविवारच्या पावसामुळे वीट व्यावसायिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान
या पावसमुळे शिवारातील भाजीपाला पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. मिरची, टोमॅटो बीन्स आदी पिकांची रोपटे वाऱयामुळे आडवी झाली आहेत. तसेच कोबी, लाल भाजी, कोथिंबीर आदींचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे बराच भाजीपाला शिवारातच पडून होता. आता पावसाने भाजीपाला खराब झाल्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
कणबर्गी भागात अनेक झाडांची पडझड
तालुक्याच्या पूर्व भागालाही चक्रीवादळाचा फटका बसला असून शनिवारी रात्रीपासून जोरदार वाऱयासह पावसाने हजेरी लावली आहे. अनके ठिकाणी झाडांची पडझड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कणबर्गी येथील बसवेश्वर गल्लीमध्ये रविवारी पहाटे तीन झाले पडली आहेत. त्यामुळे अनिल गुगरट्टी, भरत गुगरट्टी व संजय गुगरट्टी यांच्या घराच्या छताचे किरकोळ नुकसान झाले आहे. या पावसाने शेतवाडीतील भाजीपाल्याचेही मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱयांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
यावर्षी सर्वत्र असलेल्या लॉकडाऊमुळे भाजीपाल्याची विक्री मंदावली असून, अशातच शनिवारपासून झालेल्या पावसाने उरल्यासुरल्या भाजीपाल्याचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसाने सखल भागात पाणी साचले असून विहिरी व तलावातील पाण्याच्या पातळीत किंचित वाढ झाली आहे. पेरणीपूर्व मशागतीची कामे लांबणीवर पडली आहेत.