अजूनही 71,861 वीज कनेक्शन सुरू होणे बाकी
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिह्यात चक्रीवादळामुळे बाधित झालेला वीज पुरवठा सुरु करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. विविध गावात गेले 48 तास उलटूनही वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. वीज नाही म्हणून नळाला पाणी नाही, अशी दयनीय स्थिती अनेक कुटुंबांच्या वाटय़ाला दोन दिवस आली आहे. वीज नाही, पंखे बंद आणि पाणीही नाही, अशा स्थितीत कोरोनाच्या काळात जगायचे तरी कसे, असा प्रश्न जिल्हावासीय विचारत आहेत..
वीज कर्मचाऱयांनी काही भागामध्ये जलदगतीने काम करुन वीजपुरवठा सुरळीत केला. अशाप्रकारे आतापर्यंत बंद पडलेली 4 लाख 73 हजार 259 वीज कनेक्शन सुरु करण्यात आली आहेत. मात्र अजूनही 71 हजार 861 वीजकनेक्शनचा पुरवठा पूर्ववत झालेला नाही. बाधित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणची यंत्रणा दिवस-रात्र मेहनत घेत आहे. जिह्यात सर्वच्या सर्व 39 कोविड हॉस्पिटल्स व तीनही ऑक्सिजन प्लँटचा विद्युत पुरवठा पूर्वपदावर आणण्यात महावितरणला यश आले आहे. जिल्हय़ात अजूनही 441 एचटी पोल व 1 हजार 14 एलटी पोल बाधित आहेत.
एकूण 1 हजार 239 गावांपैकी 1 हजार 112 गावातील वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. अजूनही 127 गावे अंधारात आहेत. 55 पैकी 54 उपकेंद्रे सुरु झाली असून 1 बंद आहे. 7 हजार 548 पैकी 6 हजार 466 ट्रान्सफॉर्मर सुरु करण्यात आले असून 1 हजार 82 अजूनही बाधित आहेत. जिह्यातील एकूण 5 लाख 45 हजार 120 वीज कनेक्शन्सपैकी 4 लाख 73 हजार 259 सुरु करण्यात आली असून 71 हजार 861 कनेक्शन्स सुरु होणे बाकी आहे. ही माहिती 18 मे रोजी सायंकाळपर्यंतच्या सर्वेक्षणानुसार आहे. यात आणखी वाढ होऊ शकते, असे महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी सांगितले.