पुणे/प्रतिनिधी
मराठा आरक्षणासंदर्भात प्रत्येक पक्षाची भूमिका वेगळी आहे. कोरोना काळात मोर्चे काढणे योग्य नाही. सध्याच्या घडीला कोरोनाची साथ रोखणे गरजेचे आहे. त्यामुळे ही मोर्चे काढण्याची वेळ नाही. आपण जगलो तर मराठा आरक्षणासाठी लढा देऊ शकतो. आताच्या घडीला उद्रेक झाला तर त्याचा त्रास सामान्य माणसाला होऊ शकतो, असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.
खासदार संभाजीराजे यांनी मराठा समाजातील जाणकार, विद्वान आणि वकिलांशी चर्चा करूनच मी माझी पुढची भूमिका ठरवणार असल्याचे म्हंटले आहे. माझी भूमिका ही सकारात्मक असेल, असे वक्तव्य खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले. ते बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. संभाजीराजे यांनी मंगळवारी ट्विट करून आपण लवकरच मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटले होते.
सध्या मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापले आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. त्यामुळे मी तसे ट्विट केले. आता सर्व लोकांशी सविस्तर चर्चा करुन मी माझी भूमिका मांडेन, असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. माझी भूमिका ही शिवाजी महाराज, शाहू महाराजांची भूमिका असेल. माझ्या भूमिकेचा कोणत्याही राजकीय पक्षांशी संबंध नसेल. ती समस्त मराठा समाजाची भूमिका असेल, असेही खासदार संभाजीराजे यांनी यावेळी सांगितले.
‘आरक्षणावर तोडगा निघेपर्यंत गप्प बसणार नाही’
मराठा आरक्षणाच्या समस्येवर मार्ग निघेल, याविषयी मी सकारात्मक आहे. परंतु मार्ग निघेपर्यंत मी गप्प बसणार नाही. माझी यापूर्वीची भूमिकाही समंजस होती. अनेक राजकीय पक्ष सध्या त्यांची भूमिका मांडत आहेत. मात्र, ती माझी भूमिका नाही. मी मराठा आरक्षणासंदर्भात बराच अभ्यास केला आहे. १०२ वी घटनादुरुस्ती, अॅटर्नी जनरल न्यायालयात काय बोलले किंवा राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी का, यावर मी लवकरच बोलणार आहे. मी आता मराठा समाजातील जाणकार, विद्वान आणि अभ्यासकांना भेटणार आहे. तसेच न्यायमूर्ती गायकवाड यांच्याशीही मी चर्चा करेन, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.