वाठार किरोली : धामणेर ता. कोरेगाव येथील टंकसाळे आणि कोकीळ वस्तीवरील वादळी पावसाने दोन विद्युत डीपीचे पोल पडल्यामुळे मागील दहा दिवस विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. अद्याप विद्युत मंडळाने वीजपुरवठा सुरळीत न केल्यामुळे येथील सुमारे तीनशे एकर बागायती क्षेत्रातील पिके धोक्यात आली असून, शेतकऱ्यांनी वारंवार मागणी करूनही वीज बिल भरा तरच आम्ही सुरु करू, असं रहिमतपूर विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धामणेर येथील ब्रह्मपुरीनजिक टंकसाळे वस्ती व कोकीळ वस्ती येथे कृष्णा नदीकाठावर दोन विद्युत डीपी आहेत. या डीपीवर सुमारे तीस ते पस्तीस विद्युत पंप आहेत. यावर सुमारे ३०० एकर बागायती क्षेत्र आहे. यामध्ये शेतकऱ्यांची ऊस, भुईमूग, आले, अशी महत्त्वाचे पीके आहेत. या विद्युत डिपी मधील काही दोन टक्के शेतकऱ्यांनी विज बिले भरली नाहीत. परंतु बाकीच्या शेतकऱ्यांनी बिले भरलेली आहेत, अशा शेतकऱ्यांचे उन्हाळी दिवसात फार मोठे नुकसान होण्याचा धोका विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या अजब कारभारमुळे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ज्या शेतकऱ्यांनी विज बिले भरली नाहीत. त्यांची विद्युत कनेक्शन बंद करा. परंतु 50 टक्के सवलतीत शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देवून ज्यांनी वीज बिले भरली आहेत. त्यांचे तरी विद्युत पंप चालू करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होवू लागली आहे. तरी सुद्धा अधिकारी विद्युत पुरवठा सुरळीत करीत नाहीत, त्यामुळे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार विद्युत मंडळाकडून होत आहे. अशी भावना शेतकऱ्यांची होवू लागली आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.