प्रतिनिधी / बेळगाव
केंद्र सरकारच्या कृषी सुधारणा कायद्याच्या विरोधात शेतकऱयांनी सुरू केलेल्या आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाले. या अनुषंगाने राष्ट्रीय संयुक्त किसान मोर्चाने बुधवारी काळादिन पाळण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत बेळगावमध्ये भारतीय कृषक समाज आणि विविध शेतकरी संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
सरकार शेतकरीविरोधी कायदे करत आहे. सहा महिने झाले तरी सरकार आंदोलनकर्त्यांची दखल घेत नाही किंवा त्यांच्या मागण्या मान्य करत नाही. याच्या निषेधार्थ शेतकऱयांनी आपल्या घरांवर, दुकाने किंवा वाहनांवर काळे झेंडे लावावेत व सरकारचा निषेध करावा, असे आवाहन किसान मोर्चातर्फे केले होते. त्याला अनुसरून कृषक समाजाच्या नेत्यांसह शेतकऱयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडले व हातात काळे झेंडे घेऊन सरकारचा निषेध केला.
या आंदोलनाचे नेतृत्व करणारे भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष सिद्धगौडा मोदगी यांनी कृषी सुधारणा कायदे शेतकऱयांच्या हिताचे नाहीत. या कायद्यांमुळे केवळ भांडवलशहांचा फायदा होणार आहे व शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. त्याच्या निषेधार्थ आम्ही आंदोलन करीत असल्याचे सांगितले. कोरोनामुळे सामाजिक अंतराचा नियम पाळून शेतकऱयांनी हे आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.