मुंबई \ ऑनलाईन टीम
राज्यातील लॉकडाऊन संदर्भात राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनानं मोठा निर्णय जाहीर केला आहे. राज्यात पाच टप्प्यात अनलॉक होणार आहे. यानुसार काही ठिकाणी अनलॉक तसेच लॉकडाऊन करण्याचे ठरवले आहे. राज्यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे त्याठिकाणी पूर्णपणे अनलॉक केलं जाणार आहे. राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भात मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना आज माहिती दिली.
विजय वडेट्टीवार म्हणले की, . राज्यात पाच टप्प्यात अनलॉक होणार आहे. यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आणि एकूण ऑक्सिजन बेड्स २५ टक्के व्यापलेले असतील अशा ठिकाणी पूर्णपणे अनलॉक करण्यात येणार आहे. यात सर्व दुकानं, गार्डन, सलून, थिएटर्स, मनोरंजनाची ठिकाणं सुरू ठेवता येणार आहेत.
पहिल्या टप्प्यात एकूण १८ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशीम, यवतमाळ, धुळे या जिल्ह्याता आता पूर्णपणे अनलॉक करण्यात येणार आहे. या जिल्ह्यातून लॉकडाऊन मागे घेण्यात आला आहेत. या नियमांची अंमलबजावणी उद्या पासून सुरू राहणार आहे. ही अंमलबजावणी त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी करतील. दर शुक्रवारी आढावा घेतला जाईल, असंही वडेट्टीवार म्हणाले.
मुंबईत आता सध्या लोकल सुरु होणार नाही. हा रेट कमी झाला तर लोकल सुरू होईल, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. दुसऱ्या टप्प्यात अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई, मुंबई उपनगर, नंदूरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यात अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर , या दहा जिल्ह्यांचा समावेश आहे. चौथ्या टप्प्यात पुणे, रायगड या दोन जिल्हांता समावेश असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.