नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
80 कोटी गरिबांना ‘पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने’अंतर्गत दिवाळीपर्यंत म्हणजेच नोव्हेंबर 2021 पर्यंत मोफत धान्य देण्याची घोषणा, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. देशावरील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही मोठी घोषणा केली. यासोबतच त्यांनी १८ वर्षांपुढील सर्वांचं लसीकरण केंद्र सरकार मोफत करणार असल्याची घोषणा देखील यावेळी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी प्रमाणेच यावर्षीही मे-जूनपर्यंत पंतप्रधान गरीब कल्याण योजना वाढविण्यात आली होती. मात्र आता ही योजना दिवाळीपर्यंत म्हणजेच नोव्हेंबर महिन्यापर्यंत वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकार गरिबांसोबत उभे आहे. या योजनेंतर्गत 80 कोटी लोकांना मोफत धान्य मिळणार आहे.
जेव्हा नियत साफ असते, निती स्पष्ट असते आण, निरंतर परिश्रम एखादा देश करतो तेव्हा त्याचे फळ मिळतेच. भारताने एका वर्षाच्या आत दोन ‘मेड इन इंडिया’ लशी आणल्या. देशात सध्याच्या घडीला 23 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. भारतासारख्या देशात आज जर लस निर्मिती झाली नसती तर किती मोठे संकट उभे राहिले असते याचा विचारही करवत नसल्याचे देखील नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.