मंत्री एस. सुरेशकुमार यांची जिल्हय़ांतील शिक्षणाधिकाऱयांना सूचना
प्रतिनिधी /बेंगळूर
पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी दहावी परीक्षा महत्त्वाची आहे. यंदाच्या दहावी परीक्षेबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी उपाययोजना करा, अशी सूचना प्राथमिक-माध्यमिक शिक्षण मंत्री एस. सुरेशकुमार यांनी शिक्षण खात्यातील सर्व अधिकाऱयांना दिली आहे.
यंदाच्या दहावी परीक्षेबाबत राज्यातील सर्व 34 शैक्षणिक जिल्हय़ांचे जिल्हा शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकाऱयांसमवेत सुरेशकुमार यांनी बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यंदा दहावी परीक्षा पद्धतीत झालेल्या बदलाविषयी मुलांना शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी पुढकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्यानंतरच दहावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा आणि तालुका पातळीवर विशेष उपाययोजना कराव्यात. राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर सर्व प्रकारची सुरक्षा व्यवस्था करण्यासाठी जातीने लक्ष द्यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
मॉडेल प्रश्नपत्रिका पाठविणार
या आठवडा अखेरीस मॉडेल प्रश्नपत्रिका सर्व शाळांना संबंधित गटशिक्षणाधिकारी कार्यालयांमार्फत पोहोचविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना ओएमआर शिटच्या स्वरुपातील प्रश्नपत्रिका कशी सोडवावी याबाबत शिक्षकांनी सल्ले द्यावेत. अलीकडेच अनेक जिल्हय़ांमध्ये अधिकारी आणि शिक्षकांनी विविध प्रकारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून त्यांच्यामध्ये परीक्षेविषयी आत्मविश्वास निर्माण केला आहे. अशा उपक्रमांचे उर्वरित जिल्हय़ांनी देखील अनुकरण करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
प्रत्येक विषयासाठी 40 गुणांची प्रश्नपत्रिका
मागील वर्षीपेक्षा यंदा दहावी परीक्षेसाठी 30 हजार अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विविध स्तरावर अनेक टप्प्यात चर्चा केल्यानंतरच मुलांच्या हिताच्या दृष्टीने केवळ दोन दिवस परीक्षा घेण्यात येणार आहे. मागील वेळेपेक्षा अधिक सुरक्षा व्यवस्थेत परीक्षा घेतली जाणार आहे. कोविड प्रतिबंधक लस घेतलेल्यांनाच सुपरवायझर म्हणून नेमण्यात येणार आहे. यंदा प्रत्येक विषयासाठी 40 गुणांची प्रश्नपत्रिका असेल. केवळ बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश प्रश्नपत्रिकेत असणार आहे. याबाबतही विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याची आवश्यकता आहे, असे सुरेशकुमार म्हणाले.