राज्य शिवसेनेच्या वतीने पत्रादेवी हुतात्मा स्मारकावर आदरांजली
प्रतिनिधी / पेडणे
पोर्तुगीजांच्या जोखडातून गोवा मुक्त व्हावा यासाठी असंख्य कार्यकर्ते भूमिगत होऊन आपले काम करत होते. डॉ. राम मनोहर लोहिया व डॉ. ज्युलिओ मिनेझिस यांनी पुढाकारने गोवामुक्ती संग्रामाची पहिली ठिणगी पडली. पोर्तुगीज शासनाकडून गोव्यातील जनतेच्या मूलभूत अधिकारांची होत असलेली पायमल्ली लोहिया यांनी अनुभवली आणि त्याचमुळे ते पेटून उठले. यामुळे गोव्यात क्रांती करून पोर्तुगीजांना गोव्यातील सेनेने त्यांना हकलून लावले आणि तीच क्रांती आता गोव्यात राजकीय क्रांती शिवसेना करणार आहे. आज 18 जूनपासून गोव्यात एक राजकीय क्रांती करण्याचा शिवसेनेचे निर्धार केला असून यासाठी गोव्यातील युवकांनी मोठय़ा प्रमाणात शिवसेनेत प्रवेश घ्यावा आणि गोव्यात राजकीय क्रांतीसाठी सज्ज व्हावे, असे आवाहन गोवा राज्य शिवसेना प्रमुख जितेश कामत यांनी पत्रादेवी येथे हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी बोलताना केले.
गोवा राज्य शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी (दि 18) क्रांतिदिनाचे औचित्य साधून ज्यांनी गोवा स्वतंत्र करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, स्वातंत्र्य लढय़ात भाग घेतला या शूरवीरांच्या स्मृती स्थळावर पत्रादेवी येथे भेट देऊन त्यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी गोवा राज्य शिवसेना प्रमुख जितेश कामत, गोवा राज्य शिवसेना उपप्रमुख सुभाष केरकर, उत्तर गोवा जिल्हा प्रमुख सुशांत पावस्कर, गोवा राज्य सरचिटणीस मिलिंद गावस, बार्देश तालुका प्रमुख व्हिन्सेन परेरा, मंदार पार्सेकर, पेडणे तालुकाप्रमुख बाबली नाईक, विलास मळीक दिवाकर जाधव, समीर पवार, कृष्णा आदी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते पत्रादेवी येथील स्मारकावर पुष्प अर्पण करून स्वतंत्र सेनानीना मानवंदना देण्यात आली. यावेळी पत्रकारांशी बोलताना जितेश कामत म्हणाले, गोव्याच्या राजकारणात जे प्रस्थापित राजकारणी आहेत आणि एका पक्षाचे नेते आहेत ते आता सध्या क्रांतीची भाषा करत असून ती भाषा त्यांच्या तोंडी शोभत नाही. सरकारात असताना सरकार विरोधात ब्र काढत नव्हते आणि आता मात्र आता ते क्रांतीची भाष करत आहेत. त्यांची राजकीय जागा दाखवायला पाहिजे. मात्र गोव्यात आता राजकीय क्रांती घडवून आणण्यासाठी शिवसेना पुढे सरसावली ती घडवून आणण्यासाठी शिवसेना सज्ज झाली आहे. या शिवसेनेच्या कार्याला गोव्यातील युवा पिढीने मोठय़ा संख्येने शिवसेनेत प्रवेश करून या राजकीय क्रांती घडवण्याच्या कार्याला सहकार्य करावे, असे आवाहन जितेश कामत यांनी केले.
राजकीय क्रांतिसाठी शिवसेनेच्या पाठीशी राहा : केरकर
यावेळी बोलताना गोवा राज्य शिवसेना उपप्रमुख सुभाष केरकर म्हणाले की, गोव्यात 1946 मध्ये क्रांती झाली, म्हणून आज आम्हाला गोवा मुक्त झालेला दिसत आहे. या क्रांतीचे प्रणेते डॉक्टर राम मनोहर लोहिया असल्याने या आंदोलनात गोवामुक्ती संग्रामाच्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. क्रांती केल्यानेच चळवळ यशस्वी होते. आणि तेच काम गोव्यात शिवसेना आता करणार असून आजपासून गोव्यात शिवसेनेने क्रांती करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी गोव्यातील जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी सुभाष केरकर यांनी केले.
यावेळी पेडणे तालुका शिवसेना प्रमुख बाबली नाईक म्हणाले की, गोव्याच्या भाजप सरकारने गोव्यातील जनतेची अवहेलना चालवली आहे. त्याबद्दल आता खऱया अर्थाने क्रांतीची गरज असून ही क्रांती आता भाजपच्या विरोधात गोव्यात शिवसेना करणार आहे. त्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे व शिवसेनेला पाठिंबा द्या, असे आवाहन बाबली नाईक यांनी केले.
यावेळी गोवा राज्य शिवसेना सरचिटणीस मिलिंद गावस म्हणाले की, अनेक राज्यकर्ते आता क्रांतीची भाषा करत असून ही त्यांची वेगळी क्रांती गोव्यातील जनतेला माहित आहे. त्यासाठी खऱया क्रांतीची गरज असून सरकारात राहिल्यानंतर क्रांती सूचत नाही मात्र बाहेर पडल्यानंतर क्रांतीची भाषा येते आणि त्याबाबत आता शिवसेना त्याविरुद्ध आवाज उठवणार असून गोव्यातील शिवसेनेला क्रांती करण्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन गावस यांनी केले