जांबोटी-चोर्ला मार्गावरील खड्डा चुकविताना दुर्घटना
वार्ताहर /कणकुंबी
जांबोटी-चोर्ला रस्त्यावरील कालमणीजवळील एका वळणावर धोकादायक खड्डा चुकविताना दुचाकीस्वार नाल्यात पडल्याने जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता घडली. हुसेन इसाक आगा (वय 70) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो गोवा (देसाईनगर साखळी, ता. बिचोली) येथील रहिवासी आहे.
हुसेन हे दुचाकीवरून बेळगावहून चोर्लामार्गे साखळीकडे जात होते. कालमणी क्रॉसजवळील रस्त्यावरील धोकादायक खड्डा चुकविण्याच्या नादात मोटारसायकल घसरून नाल्यात पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हुसेन आगा यांनी हेल्मेटही परिधान केले होते. परंतु आपल्या दुचाकीसह (क्रमांक जीए 04 जे 3191) खोल नाल्यात पडल्याने ते ठार झाले.
दुचाकीवरून गोव्याकडे जाताना समोरून चारचाकी कणकुंबीहून बेळगावच्या दिशेने येत होती. कारचालकही खड्डा चुकविण्याचा प्रयत्न करत होता. कदाचित एकमेकांना धडक बसेल म्हणून हुसेन यांनी आपली दुचाकी रस्त्याच्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला असावा. त्यावेळी गाडीवरील ताबा सुटल्याने ते नाल्यात पडले असावे. अपघाताची माहिती जांबोटी पोलिसांना समजताच कॉन्स्टेबल नन्हेखान यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.
त्यानंतर मयताच्या नातेवाईकांना कळविण्यात आले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूर येथे हलविण्यात आला.
जांबोटी-कणकुंबी-चोर्ला मार्ग गेल्या सहा महिन्यांपासून मृत्यूचा सापळा बनला आहे. या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम अद्यापही हाती घेतलेले नाही. प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे. जांबोटी भागातील युवकांनी वेळोवेळी प्रशासनाला रास्तारोकोचा इशारा दिला होता. परंतु सुस्त प्रशासनाने अद्याप कोणतीच हालचाल केली नाही. बेळगाव-चोर्ला-पणजी या रस्त्यापैकी रणकुंडये ते साखळी या रस्त्याचे दुपदरीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून निधीही मंजूर झाला आहे. दिल्लीच्या कंपनीने रस्त्याचे कंत्राटही घेतले आहे. ऑक्टोबर महिन्यात या मार्गाच्या बांधकामाला सुरुवात करणार, असे जाहीर करण्यात आले होते. परंतु अद्याप रस्त्याचे काम सुरू करण्यासंदर्भात कोणत्याही हालचाली दिसून येत नाहीत. कंत्राटदाराला विचारले असता अजून रस्त्याचे हस्तांतर करण्यात आले नाही, असे सांगितले जाते.
जांबोटी येथे रास्तारोकोचा इशारा
गेल्या दोन- तीन महिन्यांत चोर्ला-जांबोटी दरम्यान खड्डे चुकविताना अनेक दुचाकीस्वारांनी प्राण गमावलेले आहेत. गणेश चतुर्थीदरम्यान कणकुंबीजवळील खड्डय़ात चिगुळे गावचा युवक जागीच ठार झाला होता तर एक गंभीर झाला होता. त्यानंतर चिखले दरम्यान दुचाकी रस्त्यात पडून एक जण गंभीर जखमी झाला होता. आमटे-कालमणी दरम्यान चार दिवसांपूर्वी एक बुलेटस्वार जागीच ठार झाला. कालमणीजवळील क्रॉसवर चार ते पाच मोठे अपघात झाले आहेत. एवढे होऊनदेखील प्रशासनाला जाग आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या निषेधार्थ जांबोटी येथे रास्तारोको करण्याचा इशारा दिला आहे. 8 नोव्हेंबरच्या आत रस्ता कामाला सुरुवात न झाल्यास जांबोटीत रास्तारोको आंदोलन हाती घेण्याचा इशारा जांबोटी ग्राम पंचायतचे अध्यक्ष महेश गुरव, माजी सदस्य शंकर सडेकर, कुसमळीचे युवा नेते अनंतराव सावंत, पारवाड ग्राम पंचायतचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील, आमटे ग्राम पंचायतचे माजी अध्यक्ष प्रकाश गुरव, ग्रा. पं. सदस्य लक्ष्मण बाळकृष्ण गुरव, कालमणीचे सुनील नाईक व इतर युवकवर्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.