केळबाईवाडा मये येथील प्रकार. स्थानिक संतप्त. खनिज वाहतूक रोखून धरली.
डिचोली/प्रतिनिधी
शिरगाव येथील चौगुले खाण कंपनीतून सुरू असलेल्या खनिज वाहतूक करणाऱया एका मद्यधुंद अवस्थेतील ट्रकचालकाने केळबाईवाडा मये येथे एका दुचाकीचालकाला चुकीच्या दिशेने येऊन ठोकारल्याने मयेत वातावरण तापले. केळबाईवाडा मये येथील स्थानिकांनी लगेच खनिज वाहतूक रोखून धरली.
सदर घटना काल शुक्र. दि. 29 एप्रिल रोजी संध्या. 3.30 वा. च्या घडली. शिरगाव पैरा येथून मये गावातील रस्त्यावरून सध्या सर्व नियम धाब्यावर बसवून खनिज वाहतूक सुरू आहे. गावातील अरूंद रस्ते आणि दिवसभर सुरू असलेली सार्वजनिक वाहतूक यात सुरू असलेल्या खनिज वाहतुकीमुळे गावातील लोकांचे जिवन हैराण करून सोडले आहे. गेल्या महिनाभरापूर्वी मयेतील खनिज वाहतुकीचा विषय चांगलाच पेटला होता. आता पुन्हा सदर खनिज वाहतूक सुरू करण्यात आल्याने स्थानिक लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
काल संध्याकाळी केळबाईवाडा मये येथून आपल्या दुचाकीतून डिचोली येथे निघालेल्या आत्माराम नाईक यांना मद्यधुंद ट्रकचालकाने ठोकारले. केवळ सुदैवाने त्यांचा मोठा अपघात होता होता वाचला. डिचोलीच्या दिशेने तीन ट्रक एका चालीत व एका रांगेत चालत असताना त्यांना मागे टाकण्याच्ता प्रयत्नात असताना मध्यभागी चालणाऱया जयराम नावाच्या जीए 04 टि 1811 या क्रमांकाच्या ट्रकचालकाने पुढील ट्रकाला मागे घेण्यासाठी मागे न पाहताच ट्रक पुढे रेटला. त्याचवेळी या तीनही ट्रकांना मागे टाकण्यासाठी पुढे आलेल्या आत्माराम नाईक यांच्या दुचाकीला ट्रकची धडक बसली. या धडकेत ते रस्त्याच्या बाजूला पडल्याने त्यांना किरकोळ जखम झाली. अपघाताचा अंदाज घेत त्यांनी गाडी सोडून दिली. अन्यथा त्यांची जोरदार धडक वीजखांबाला बसली असती व मोठा अपघात झाला असता.
या प्रकाराने संतापलेल्या केळबाईवाडा मयेतील स्थानिक लोकांनी खनिज वाहतूक रोखून धरली. पोलिसांना पाचारण करण्यात आले. मात्र अपघातग्रस्त दुचाकी काढण्यावरून पोलिसांनी स्थानिकांनाच उलट प्रश्न विचारल्याने काही काळ पोलीस व स्थानिकांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. यावेळी अपघातग्रस्त ट्रकचालकाने मात्र आपण मद्यप्राशन केल्याचे लोकांसमोर मान्य केले.
अखेर हे प्रकरण पोलीस स्थानकात पोहोचले असता संपूर्ण घटनेवर चर्चा होऊन सामंजस्यपणाने मिटविण्यात आले. सध्या मयेतून सुरू असलेल्या खनिज वाहतुकीविषयी डिचोली उपजिल्हाधिकारी व इतर संबंधित अधिकाऱयांना कोणत्याही प्रकारचे कायदेशीर पत्र करण्यात आलेले नाही. अशी माहिती मिळाली आहे. तसेच राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाने जारी केलेल्या नियमांप्रमाणे सदर वाहतूक चालविण्यात येत नसल्याचा ठपका मयेतील स्थानिक आणि मये भु विमोचन नागरिक कृती समितीकडून ठेवण्यात आला आहे. राजकीय बळाचा वापर करून सदर खनिज वाहतूक बेकायदेशीरपणे सुरू असल्याची टिका स्थानिकांकडून करण्यात येत आहे.