झारखंडची राजधानी रांची येथील प्रसिद्ध दक्षिण काली मंदिरात गेली 100 वर्षे एक दिवा एकदाही न विझता सातत्याने प्रज्ज्वलित राहिलेला आहे. हा संपूर्ण जगातील एक विक्रम असावा अशी शक्यता आहे. या मंदिरात कालीमाता आणि या दिव्याच्या दर्शनासाठी केवळ भारतातूनच नव्हे तर विदेशातूनही अनेक भाविक येत असतात. या मंदिरात प्रत्येक वर्षाच्या कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षामधील अमावस्येदिवशी महापूजा आयोजित केली जाते. त्या दिवशी या मंदिरात लाखो भाविकांची रिघ लागलेली असते. दुर्गामातेच्या विक्राळ स्वरुपातील ही कालीमाता आहे. या मंदिराचे निर्माण कार्य 200 वर्षापूर्वी झालेले आहे. तर येथील दिवा 100 वर्षांहून अधिक काळ सतत तेवता ठेवण्यात आला आहे.
ब्रिजेश मिश्र हे या मंदिराचे पुरोहित आहेत. त्यांचे पूर्वज 1850 मध्ये रांची येथे स्थायीक झाले. त्यांनी हे मंदिर निर्माण केले आणि त्यात कालीमातेच्या पाषाण मूर्तीची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान बनलेले आहे. 100 वर्षांपूर्वी कालीमातेच्या मूर्तीनजीक दिव्याची स्थापना करण्यात आली प्रारंभी हा दिवा तेवता ठेवण्यासाठी करंजेल तेलाचा उपयोग होत असे. आता हा दीप प्रज्वलित ठेवण्यासाठी शुद्ध तुपाचा उपयोग केला जात आहे. कालीमातेसह या दीपाचे दर्शन घेतल्यास शांतता आणि समृद्धी प्राप्त होते असा विश्वास आहे.