शिरोळ/प्रतिनिधी
शिरोळ येथील पंचगंगा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यावरून नदीपलीकडच्या मळी भागातून वैरण घेवून येत असताना पाण्यात पडून बैल जोडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, बंडू मोडके व राजू गावडे यांच्या मालकीची असणारी ही बैलजोडी शिरोळ येथील पंचगंगा नदीवरील बंधार्यावरून नदीपलीकडच्या मळी भागातून वैरण घेवून येत असताना बंधार्यातील पाण्याच्या आवाजानं बैलजोडी बिथरल्याने नदीच्या पाण्यात पडली. त्यामुळे बैलजोडीचा पाण्यात बुडाल्याने गुदमरून मृत्यू झाला ही घटना आज सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. गावडे यांच्या बैलजोडीच्या पाण्यात गुदमरून मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी सकाळी बंडू मोडके हे आपला एक बैल व राजू गावडे यांचा एक बैल अशी दोन बैलं गाडीला जूपून पंचगंगा नदी पलीकडील मळीत वैरण आणण्यासाठी गेले होते. गाडीत वैरण घेऊन ते शिरोळकडे येत असताना पंचगंगा नदी काठावर पंचगंगा नदीवरील बंधाऱ्यावर आले असता पाण्याच्या आवाजाने व प्रवाहामुळे दोन्ही बैले बिथरले. बंधारास संरक्षक कठडे नसल्याने ती दोन्ही बैलं गाडीसह पाण्यात घसरली दुर्दैवाने दोन्ही बैलांचा मृत्यू झाला. बैलगाडीचे मालक बंडू मोडके यांनी प्रसंगावधान राखून बैलगाडीतून उडी घेतली. त्यामुळे सुदैवाने ते वाचले. मोडके व स्थानिक ग्रामस्थांनी यावेळी बैलांना आणि बैलगाडीला बाहेर काढले. सध्याचा पाउस आणि पाण्याचा जोर पाहता बंधार्यावरून वाहणार्या पाण्यातून धोकादायक वाहतूक करणे टाळावे असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
दरम्यान गेल्या अनेक वर्षापासून येथील पंचगंगा नदीवरील बंधाऱ्याची मोठी दुरावस्था झाली आहे. बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला असलेले संरक्षक कठडे मोडले आहेत, यामुळे अनेक दुर्घटना घडत आहेत. यापूर्वीही पाण्यातून अनेक जण वाहून गेले आहेत. त्यामुळे बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला तात्काळ संरक्षक कठडे बसवावेत. बंधाऱ्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यासाठी काही लोकप्रतिनिधींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. तसेच बंधारा दुरुस्तीच्या कामासाठी निधी मंजूर झाला होता. मात्र निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे महापुराच्या पाण्यात केलेले बंधारा दुरुस्तीचे कामच वाहून गेले. यामुळे निकृष्ट दर्जाच्या झालेल्या कामाची चौकशी करावी. संबंधित कामावर देखभाल करणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांवर व निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.