हजारो झाडांची कत्तल करण्याची तयारी
चांगल्या प्रकृतीसाठी डॉक्टर वृक्षांच्या सान्निध्यात राहण्याचा सल्ला देतात. परंतु जपानमध्ये हेच वृक्ष समस्येचे कारण ठरले आहेत. तेथे देवदार अन् सरू नावाच्या वृक्षांमधून बाहेर पडणारे परागकण आजाराचे कारण ठरले आहेत. दरवर्षी हा आजार अनेक लोकांना होत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या सरकारने हजारो वृक्षांची तोड करण्याचा आदेश दिला आहे.
जपानच्या सरकारने देवदार अन् सरूच्या 70 हजार वृक्षांची तोड करण्याचा निर्णय घेतला आहे. या वृक्षांची संख्या 20 टक्क्यांपर्यंती कमी करण्याचा सरकारचा विचार आहे. या वृक्षांमुळे पूर्ण देशात लोक आजारी पडत आहेत. ही एक सामाजिक समस्या ठरली आहे. जर याला आताच रोखण्यात न आल्यास पुढील काळात मोठी समस्या उभी राहणार असल्याचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी म्हटले आहे. याचमुळे सरकारने पुढील 10 वर्षांमध्ये देवदार वृक्षांचे प्रमाण 20 टक्क्यांनी कमी करण्याची योजना आखली आहे.
जपानमध्ये दरवर्षी ‘हे फीव्ह’मुळे हजारो लोक आजारी पडत आहेत. देवदार अन् सरूच्या झाडांमधून निघणाऱ्या परागकणांमुळे हा आजार फैलावत असल्याचे मानले जातेय. प्रत्येक हंगामात सुमारे 40 टक्के लोकसंख्या या आजाराला सामोरी जात आहे. जपानी तापाचे 70 टक्के रुग्ण देवदारच्या परागकणांमुळेच निर्माण होतात असे वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या अहवालात नमूद आहे. आता सरकार या वृक्षांना हटवून त्याजागी कमीतकमी परागकण बाहेर सोडणाऱ्या वृक्षांची लागवड करणार आहे.
देवदारच्या वृक्षांनी जपानचे 18 टक्के वनक्षेत्र व्यापले आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर येथे निर्मितीउद्योगाला चालना देण्यासाठी वनीकरण कार्यक्रम राबविण्यात आला होता. तेव्हा एकाचवेळी लाखो रोपांची लागवड करण्यात आली होती. देवदार वृक्षांमधून निघणाऱ्या परागकणांमुळे हे फिव्हरचे रुग्ण वाढतात. या आजारात नाक गळणे, खाज सुटणे, डोळ्यांतून पाणी वाहणे, काही लोकांना श्वसनाचा त्रास तसेच कानातही वेदना होऊ लागते. पराग कण अॅलर्जीची लक्षणे गंभीर असल्यास निद्रानाश देखील होऊ शकतो.