‘तरुण भारत’च्या वृत्तामुळे पटली ओळख
बेळगाव : गांधीनगर, रेल्वेगेटजवळ रेल्वेखाली आत्महत्या केलेल्या अनोळखी युवकाची ओळख पटली असून तो गणेशपूरचा राहणारा होता. ‘तरुण भारत’मधील वृत्तामुळे मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. अभिजित उत्तम पाटील (वय 30, रा. गणेशपूर) असे त्या युवकाचे नाव आहे. मंगळवार दि. 4 एप्रिल रोजी पॅसेंजर रेल्वेखाली त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटली नव्हती. 6 एप्रिलच्या तरुण भारतमध्ये रेल्वेखाली अनोळखीचा मृत्यू या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या सचित्र वृत्तामुळे कुटुंबीयांना मृतदेहाची ओळख पटविता आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिजितची मानसिक स्थिती ठिक नव्हती. उपचारासाठी त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी त्याची आई जेवण आणण्यासाठी घरी गेली. त्याचवेळी हॉस्पिटलमधून बाहेर पडलेल्या अभिजितने गांधीनगर, रेल्वेगेटजवळ रेल्वेखाली आपले जीवन संपविले आहे. बेळगाव रेल्वे पोलीस पुढील तपास करीत आहेत.