खेड प्रतिनिधी
शाळेतून घरी परतत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृणपणे खून करत मृतदेह लपवल्याप्रकरणी बुधवारी खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी.एल. निकम यांनी आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. सरकारी वकील ॲड. पुष्पराज शेट्ये यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी सूर्यकांत याला ही शिक्षा ठोठावण्यात आली.
खेड तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी १९ जुलै २०१८ रोजी शाळेतून घरी परत येत असताना अचानक बेपत्ता झाली होती. तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर देखील ती सापडली नाही म्हणून तिच्या वडिलांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. २० जुलै रोजी अल्पवयीन मुलीचा डोक्याचा पट्टा गावातील एका इसमाच्या घरा जवळ काही ग्रामस्थांना दिसून आला. त्यानंतर ग्रामस्थ व तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल गंभीर व सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत लाड यांनी आरोपी सूर्यकांत नवनाथ चव्हाण ( २९) याला ताब्यात घेतले होते.
पोलिसांच्या चौकशी अंती सूर्यकांत याने गुन्ह्याची कबुली दिली व मृतदेह कुठे लपवला आहे याची माहिती दिली. खेड पोलिसांनी सूर्यकांत याला अटक करून त्याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम ३०२, ३७६(आय), ३६३, ३६४, २०१, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्या (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दखल करण्यात आला.
येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय वर्ग १ येथे आरोपी सूर्यकांत विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्यात तब्बल २८ साक्षीदार तपासण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक सुजित गडदे, कर्मचारी सूरज माने, राम नागुलवार यांनी या प्रकरणी सहकार्य केले. कोकण विभाग विशेष पोलीस महा निरीक्षक प्रवीण पवार तत्कालीन पोलीस अधीक्षक मोहीत कुमार गर्ग यांनी सहकार्य केले.
सरकारी वकील ॲड. पुष्पराज शेट्ये यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी सूर्यकांत याला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधिश वर्ग १ श्री डी.एल. निकम यांनी मरे पर्यंत फाशी व वित्त दंड अशी शिक्षा सुनावली आहे. हा निकाल ऐकण्यासाठी खेड न्यायालयाच्या आवारात शेकडो ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
अल्पवयीन बालकाविरोधात गुन्हा करणाऱ्या नराधमाना कठोर संदेश देणारा निर्णय आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या न्यायालयीन इतिहासात सुमारे ४५ वर्षाने मरे पर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. खेड न्यायालयाची नवीन इमारत झाल्यापासून अशा प्रकारचा निकाल पहिल्यांदाच आला आहे. हा न्याय मिळाला असल्याने वकिली जीवन सार्थकी लागल्याचे समाधान आहे, अशी प्रतिक्रिया सरकारी वकील पुष्पराज शेट्ये यांनी व्यक्त केली.