राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी नाही : केंद्रीय मंत्रिपद अडचणीत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मोदी सरकारच्या 4 मंत्र्यांच्या राज्यसभेतील कार्यकाळ संपुष्टात येत आहे. यात भाजपच्या कोटय़ातील तीन तर एक मंत्री संयुक्त जनता दलाच्या कोटय़ातील आहे. भाजपने स्वतःचे दोन मंत्री निर्मला सीतारामन आणि पियूष गोयल यांना पुन्हा राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. तर मुख्तार अब्बास नकवी यांना राज्यसभेकरता उमेदवारी देण्यात आलेली नाही. तर संजद कोटय़ातून मोदी सरकारमध्ये मंत्री असलेल्या आरसीपी सिंह यांना उमेदवारी नाकारून खीरू महतो यांना संधी देण्यात आली आहे.
मुख्तार अबास नकवी आणि आरसीपी सिंह यांचा राज्यसभेतून पत्रा कट झाल्याने आता त्यांच्यासमोर स्वतःचे मंत्रिपद कायम राखण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. भाजपने राज्यसभेसाठी 22 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली असून यात नकवी यांचा समावेश नाही. अशा स्थितीत 6 महिन्यांच्या आत आरसीपी आणि नकवी संसदेचे सदस्य म्हणून निवडून न आल्यास त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. अशा स्थितीत मोदी सरकारमध्ये फेरबदल दिसून येऊ शकतो.
झारखंडमधून राज्यसभेवर
मोदी सरकारमध्ये मुस्लीम चेहरे म्हणून सामील मुख्तार अब्बास नकवी 2016 मध्ये झारखंडमधून राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यांचा कार्यकाळ 7 जुलै रोजी संपुष्टात येत आहे. भाजपने झारखंडमधून राज्यसभेसाठी यंदा नकवी यांच्या जागी आदित्य साहू यांना उमेदवारी दिली आहे. झारखंडमधून पत्ता कट झाल्याने नकवी यांना अन्य राज्यातून भाजपची उमेदवारी मिळू शकते असे मानले जात होते. परंतु सोमवारी यादी जाहीर झाल्यावर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. अशा स्थितीत नकवी यांच्यासमोर पेच निर्माण होणार आहे.
लोकसभा पोटनिवडणूक
मुख्तार अब्बास नकवी यांच्यासमोर आता उत्तरप्रदेशातील रामपूर मतदारसंघाची पोटनिवडणूक लढविण्याचा पर्याय आहे. 1998 मध्ये ते याच मतदारसंघाचे खासदार राहिले आहेत. रामपूर मतदारसंघातून तीनवेळा निवडणूक लढविलेले नकवी एकदाच विजयी झाले आहेत. अशा स्थितीत भाजपने त्यांना रामपूरमध्ये उमेदवार म्हणून उतरविल्यास त्यांना विजय मिळवाव लागेल, अन्यथा मंत्रिपदावर पाणी सोडावे लागू शकते.
आरसीपी सिंह यांच्यासमोरील आव्हान तर मुख्तार अब्बास नकवी यांच्याप्रमाणेच संजदचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय इस्पात मंत्री आरसीपी सिंह यांच्यासाठीही अडचणी उभ्या राहिल्या आहेत. संजदने आरसीपी सिंह यांच्या जागी यंदा झारखंडमधील नेते खीरू महतो यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. अशा स्थितीत आरसीपी सिंह यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे. एकेकाळी नितीश कुमार यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून मानले जाणाऱया आरसीपी सिंह यांचा पक्षात मोठा प्रभाव होता. संजदमध्ये महासचिवपासून अध्यक्षपद त्यांनी सांभाळले, परंतु नितीश कुमार यांनी त्यांना वरिष्ठ सभागृहात जाण्याची संधी तिसऱयांदा दिलेली नाही.