विद्यार्थ्यांची नजिकच्या आश्रमशाळेत व्यवस्था होणार
वसीम शेख, अंकुश कोकरे/ कुडाळ
खिरखंडी (ता. जावली) येथील मुलींच्या जीवघेण्या शिक्षण संघर्षाची बातमी माध्यमांनी केल्यानंतर त्याची दखल मुंबई हायकोर्टाने घेतली होती. त्यावर परत एकदा जिल्हा प्रशासनाला आदेश दिल्यानंतर नूतन जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, सीईओ विनय गौडा, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार राजेंद्र पोळ, सहाय्यक वन संरक्षक सुरेश साळुंखे, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, वनक्षेत्रपाल बाळकृष्ण हसबनीस यांच्या समवेत तेथील ग्रामस्थांची भेट घेतली.
श्रीखंडी गावाला भेट देऊन खिरखंडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झालेल्या बैठकीत मुलांकडून पालकांकडून संघर्षमय प्रवास जाणून घेऊन तातडीने विद्यार्थ्यांची नजीकच्या आश्रमशाळेमध्ये पर्यायी व्यवस्था करण्याची ग्वाही दिली.
यावेळी ग्रामस्थ म्हणाले की, आमच्या पुनर्वसनाला आठ वर्षे झाले असून आम्हाला ठाणे जिह्यातील भिवंडी सोडून सातारा जिह्यात कुठेही पुनर्वसन द्या यावर बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, जिह्यात जमीन उपलब्ध असेल तर आठ दिवसात विषय मार्गे लावला जाईल. आपण येथे खूप वाईट परिस्थितीत राहत असून मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावत असून आपण त्यांची पर्यायी व्यवस्था करूया, असे आश्वासन जिल्हाधिकाऱयांनी दिले.
खिरखंडी हे गाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधील असून या गावामध्ये पूर्वी एकुण 70 कुटुंबे वास्तव्यास होती. कोयना धरणाच्या निर्मितीमुळे या गावाचे एकसाल सागाव (ता. भिवंडी, जि. ठाणे) या गावामध्ये पुनर्वसन झाले. तथापि पुनर्वसन झाल्यानंतरही 70 कुटुंबांपैकी 6 कुटुंबांनी पुनर्वसन झालेल्या गावातील जमीन ताब्यात घेतली नाही, तर एका कुटुंबाने पुनर्वसनाच्या ठिकाणची जमीन ताब्यात घेतली आहे, परंतू त्या कुटुंबातील काही व्यक्ती खिरखंडी येथेच वास्तव्यास आहेत. सद्यस्थितीत एकुण 7 कुटुंबे पुनर्वसन झालेल्या गावांमध्ये स्थलांतरित न होता ती खिरखंडी येथेच वास्तव्यास आहेत. खिरखंडी येथे जिल्हा परिषदेची इयत्ता 1 ली ते 5 पर्यंत शाळा आहे. सद्यस्थितीत सदर गावातील एकुण 10 विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यापैकी 2 विद्यार्थी गावातीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत, तर उर्वरित 8 विद्यार्थी खिरखंडी ते शेंबडी असा प्रवास लाँचने / बोटीने करतात. सदर विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येण्या-जाण्यासाठी पुर्वीपासुनच जिल्हा परिषदेच्या लाँचची सेवा उपलब्ध करुन देण्यात आली असून, विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी लाँचमधून प्रवास करताना त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक साधने प्रशासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. तथापि लाँचच्या वेळापत्रकानुसार काही दिवशी या विद्यार्थ्यांना लाँचची सेवा उपलब्ध होत नाही परंतू प्रशासनामार्फत लाँचच्या वेळापत्रकामध्ये बदल करुन विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करण्यात येतील. लाँचमधील प्रवासानंतर सदर ठिकाणी वर्गीकृत रस्ता उपलब्ध नसल्याने विद्यार्थी शेंबडी ते अंधारी असा एकुण 4 कि.मी. चा पायी प्रवास अवर्गीकृत पाऊल वाटेने करुन अंधारी येथे शिक्षणासाठी जात आहेत. खिरखंडी येथील विद्यार्थ्यांची शिक्षणाची व राहण्याची सोय अंधारी येथील आश्रमशाळेमध्ये करण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येत होते. परंतू सद्यस्थितीत या विद्यार्थ्याचे पालक त्यासाठी सहमत नव्हते. प्रशासनामार्फत या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवृत्त करण्याचे प्रयत्न सुरु होते जेणेकरुन या विद्यार्थ्यांना लाँचने अथवा पायी प्रवास करावा लागणार नाही. या प्रयत्नांचा भाग म्हणून जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांशी विद्यार्थ्यांबाबत आणि पुनर्वसनाबाबत चर्चा केली या प्रयत्नांना यश आले अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.
यावेळी गटशिक्षणाधिकारी कर्णे, तालुका वैद्यकीय अधिकारी भगवानराव मोहिते राम पवार केंद्रप्रमुख विजय देशमुख, अशोक मनुकर, दिपक भुजबळ तसेच विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते