सुकृत मोकाशी / पुणे :
एमपीएससीच्या उमेदवारांची प्रवेशपत्रे लीक होणे, हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अपयश असून, याप्रकरणी आयोगाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
राज्य सेवा तसेच महाराष्ट्र अराजपत्रित गट ‘ब’ तसेच गट ‘क’ मुख्य परीक्षा या ऑनलाइन माध्यमातून घेण्यात येणार असून, यामध्ये विद्यार्थ्यांचा खासगी डाटा लीक झाला आहे. या पार्श्वभूमीवर ‘तरुण भारत’ने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याबाबत विद्यार्थी नवनाथ मुगटकर म्हणाला, 93 हजार विद्यार्थ्यांचा खासगी डाटा टेलिग्रामवर लीक होणे, हे आयोगाचे अपयश आहे. ओटीपी आल्याशिवाय आमचे हॉल तिकीट आम्हालासुद्धा पाहता येत नाही. आयोगच ग्रुपचा ऍडमिन असतो. त्याला हॅक करुन हॅकरने डाटा लीक केला. डाटा लीक झाल्याची बाब आयोगालाही माहीत नव्हती. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर माहिती टाकल्यावर आयोगाला डाटा लीक झाल्याचे कळाले.
विशाल जोंधळे म्हणाला, डाटा लीकसारखा प्रकार होता कामा नये. असे प्रकार टाळण्यासाठी परीक्षा ऑफलाईन घ्यावी. ऑनलाईन प्रणाली असल्याने असे घोळ लवकर निदर्शनास येत नाहीत.
विशाल पाटील म्हणाला, अशा गोष्टींमुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासातून लक्ष उडते. परिणामी त्यांचे नुकसान होऊ शकते. तसेच सिस्टिमवरचा असलेला विश्वासही कमी होतो. त्यामुळे याबाबत योग्य ती कारवाई करावी. सीसीटीव्ही चित्रीकरणाने विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवणे, हे आधीच्या परीक्षांमध्येही करण्यात आले आहे. यावेळी अधिक सतर्कतेने केले जाणार असेल, तर स्वागतच आहे.
परीक्षा ऑफलाईनच घ्याव्यात : महेश घरबुडे
स्पर्धा परीक्षा समितीचे समन्वय समितीचे कार्याध्यक्ष महेश घरबुडे म्हणाले, यूपीएसससी ऑफलाईन परीक्षा घेते. त्यामुळे एमपीएससीनेही ऑनलाईनचा अट्टहास धरू नये. बाहेरच्या राज्यात ऑनलाईनचा प्रयोग फसला आहे. ऑनलाईन परीक्षेला आमचा विरोध आहे. त्यामुळे एमपीएससीची मुख्य परीक्षा आणि गट ‘ब’ संयुक्त परीक्षा ही ऑफलाइनच घ्यावी, अशी आमची मागणी आहे.